धाराशिव | तुळजापूर शहर आणि श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात चिनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचा गंभीर आरोप करत, “हिंदुत्ववादी सरकारनेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?” असा थेट सवाल ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पावसाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर केली.
आमदार पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकारने ७ मार्च २०२४ रोजीच्या राजपत्राद्वारे सुरक्षेच्या कारणास्तव काही चिनी कंपन्यांच्या सीसीटीव्ही प्रणालींवर निर्बंध घातले असून, STQC (स्टँडर्डायझेशन टेस्टिंग अँड क्वालिटी सर्टिफिकेशन) मान्यताप्राप्त कंपन्यांचेच कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, तुळजापूर शहरात तब्बल ६७ ठिकाणी युनिव्हियू (Uniview) कंपनीचे सीसीटीव्ही बसविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
“छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाऊ शकत नाही. गृह विभागाच्या अखत्यारीत हे काम होत असताना केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन का झाले नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे,” अशी मागणीही त्यांनी केली.
इतिहासाचा संदर्भ देताना पाटील म्हणाले की, १६५९ मध्ये अफजलखानाच्या स्वारीवेळी स्थानिक पुजारी आणि तुळजापूरकरांनी आई तुळजाभवानीच्या मूर्तीचे संरक्षण केले होते. मात्र, आज हिंदुत्ववादी सरकारच्या काळातच मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असा आरोप त्यांनी केला.
अयोध्येतील राम मंदिरातील चोरीच्या घटनेचाही उल्लेख करत, हिंदूंच्या प्रमुख श्रद्धास्थानांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. “मतदारांनी हिंदुत्ववादी सरकार म्हणून निवडून दिलेल्या सरकारच्या काळातच अशा घटना घडत असतील, तर हेच हिंदुत्व आहे का?” असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला.
चिनी कंपनीच्या सर्व्हरद्वारे संवेदनशील माहिती परदेशात जाण्याचा धोका असल्याचा दावा करत, या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी, संबंधित यंत्रणा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली.






