मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने मोठा बदल केला आहे. आता या निवडणुकांसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे जाहीर करण्यात आलेल्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू होती. मात्र, २८ जानेवारी २०२६ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांचे अपघाती निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे राज्य शासनाने २८ ते ३० जानेवारी दरम्यान राज्यभर दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना प्रचार करणे सोयीचे होणार नाही. परिणामी, ठरलेल्या वेळेत मतदान व मतमोजणीचे टप्पे पार पाडणे शक्य नसल्याने निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
‘या’ १२ जिल्ह्यांत होणार निवडणूक:
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी हा सुधारित कार्यक्रम लागू असेल.
निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम (परिशिष्ट-१ नुसार):
-
सुधारित कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करणे: ३१ जानेवारी २०२६ (शनिवार)
-
मतदानाची तारीख: ०७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) – सकाळी ७.३० ते सायं. ५.३० पर्यंत.
-
मतमोजणीची तारीख: ०९ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) – सकाळी १०.०० पासून.
-
विजयी उमेदवारांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे: ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ जानेवारीच्या पुढे दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली होती, त्याचा संदर्भ घेत आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. तोपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता लागू राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.







