धाराशिव: कत्तलीसाठी अत्यंत क्रूरपणे गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ जनावरांची सुटका केली असून, वाहनासह एकूण ९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज (दि. ९ फेब्रुवारी २०२६) सकाळी येडशी-धाराशिव रोडवर आळणी पाटीजवळ करण्यात आली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार हे आपल्या पथकासह आज सकाळी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास येडशी ते धाराशिव रोडवर आळणी पाटीजवळ त्यांना एका वाहनावर संशय आला. पोलिसांनी तात्काळ सदरील वाहनाला थांबवण्याचा इशारा केला.
वाहन थांबवून पाहणी केली असता, त्यात अत्यंत दाटीवाटीने आणि क्रूरपणे ५ गोवंशीय जनावरे भरल्याचे निदर्शनास आले. या जनावरांना हालचाल करण्यासाठी देखील पुरेशी जागा नव्हती. पोलिसांनी वाहन चालकाकडे जनावरांच्या वाहतुकीबाबत आणि परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. त्यामुळे हे वाहन जनावरांच्या कत्तलीसाठीच जात असल्याचा पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी तात्काळ सदर वाहन जप्त करून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात नेले. दोन पंचांच्या समक्ष पाहणी केली असता, वाहनात ५ गोवंशीय जनावरे आढळली. पोलिसांनी जनावरे आणि वाहन असा एकूण ९,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४/२०२६ अन्वये, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (D) (E) (H) आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५(अ) (१), ९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे हे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस हवालदार दत्तात्रय राठोड, दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, पोलीस नाईक अशोक ढगारे, पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड तसेच धाराशिव ग्रामीणचे पोलीस हवालदार अविनाश शिंदे आणि विशाल खोसे यांनी सहभाग घेतला.





