एकेकाळी स्वतःला अत्यंत ‘शिस्तप्रिय’ आणि ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवून घेणारा भाजप आता तसा राहिलेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे सताड उघडे ठेवल्यामुळे, मूळ भाजप आता कुठेतरी हरवलाय आणि या पक्षाचे ‘काँग्रेस-राष्ट्रवादी युक्त भाजप’ मध्ये कधी रूपांतर झाले, हे निष्ठावंतांनाही कळले नाही. धाराशिव जिल्ह्याचे उदाहरण पाहिले, तर या बजबजपुरीचा आणि सत्तेच्या हव्यासाचा खरा खेळ समजून येतो.
साहेबांचे मंत्रीपदाचे स्वप्न: ‘इकडे ना तिकडे, नशिबात फक्त खडे!’
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा भाजपमधील प्रवेशाचा इतिहास मोठा रंजक आहे. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर साहेबांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून कमळ हातात घेतले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते तुळजापूरमधून भाजपच्या तिकिटावर विजयीही झाले. त्यांना घाई होती ती कॅबिनेट मंत्री होण्याची आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बनण्याची! पण दुर्दैवाने राज्यात महाविकास आघाडी (MVA) स्थापन झाली आणि साहेबांना बसावे लागले थेट विरोधी पक्षात.
(राजकीय वर्तुळातील जोक असा आहे की, साहेबांनी जर पक्षांतर केले नसते आणि ते राष्ट्रवादीतच राहिले असते, तर पवार साहेबांनी त्यांना कधीच कॅबिनेट मंत्री केले असते!)
पुढे २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले, शिवसेना फुटली आणि भाजप सत्तेत आली. साहेबांना वाटले आता तरी लाल दिवा मिळेल, पण तिथेही गेम झाला! साहेबांना मंत्रीपद मिळाले नाहीच, उलट परंड्याचे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक तानाजी सावंत मंत्री झाले आणि जिल्ह्याचे ‘पालकमंत्री’ म्हणून मिरवू लागले.
२०२४ मध्ये जेव्हा पुन्हा भाजपचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हाही साहेबांना मंत्रीपद मिळाले नाही. अखेर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना ‘मित्रा’ (MITRA) संस्थेचे उपाध्यक्ष करून त्यांची बोळवण करण्यात आली. साहेबांच्या बगलबच्च्यांनी या पदाला ‘राज्यमंत्री पदाचा दर्जा’ असल्याचे भासवून खूप हवा करण्याचा प्रयत्न केला, पण माध्यमांनी साहेबांच्या या ‘फेक नॅरेटिव्ह’चा फुगा फोडून हे दावे हाणून पाडले!
दत्ताभाऊंची ‘सँडविच’ अवस्था: इकडे आड, तिकडे विहीर!

राणा पाटील भाजपमध्ये आल्यापासून पक्षात जो ‘जुना विरुद्ध नवा’ वाद पेटला आहे, जुन्याचे नेतृत्व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर करत आहेत. या दोन गटांच्या भांडणात सर्वात केविलवाणी अवस्था कुणाची झाली असेल, तर ती आहे विद्यमान जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची!
दत्ताभाऊ हे गेली अनेक वर्षे पक्षात आहेत आणि पूर्वी ते सुजितसिंह ठाकूर यांचे कट्टर समर्थक मानले जात. पण आज त्यांची अवस्था ‘सँडविच’सारखी झाली आहे.
-
राणा पाटील गट समजतो की, दत्ताभाऊ हे ठाकुरांचेच (जुन्या गटाचे) माणूस आहेत.
-
आणि सुजितसिंह ठाकूर गट समजतो की, दत्ताभाऊ हे आता राणा पाटलांच्या वळचणीला गेले आहेत!
यावरूनच जुन्या गटाचे ॲड. व्यंकट गुंड यांनी दत्ताभाऊंवर तोफ डागली होती— “जिल्हाध्यक्षांचा कारभार स्वतःच्या मताने चालतोय की बंगल्याच्या (राणा पाटलांच्या) आदेशावर? पक्षाचे हित महत्त्वाचे की ‘बंगला’ हित?” (अर्थात, यावर दत्ताभाऊंचे समर्थक ॲड. भोसले यांनी गुंड यांना सडेतोड उत्तर दिले, हा भाग वेगळा).
संताजी चालुक्यांचा ‘कणा’ अन् दत्ताभाऊंची ‘तडजोड’!
दत्ताभाऊंवर हा संशय का घेतला जात आहे? याचे उत्तर इतिहासात आहे. दत्ताभाऊंच्या आधी संताजी चालुक्य हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. चालुक्य यांनी कधीही राणा पाटील यांची ‘हांजी-हांजी’ केली नाही. ते कधीही आदेश घेण्यासाठी साहेबांच्या ‘बंगल्यावर’ गेले नाहीत आणि पक्षाच्या बैठका साहेबांच्या ‘भवन’मध्ये न घेता बाहेर तटस्थ ठिकाणी घेतल्या.
मग दत्ताभाऊ असे का वागत नाहीत? तर याचे साधे आणि सोपे उत्तर त्यांच्या ‘लघु उद्योगात’ दडले आहे! दत्ताभाऊ हे केवळ राजकारणी नाहीत, तर ते उद्योजक आहेत. त्यांचा स्वतःचा गुऱ्हाळ (गूळ कारखाना), खासगी बँक आणि पेट्रोल पंप आहे. राजकारणात सत्तेशी पंगा घेऊन व्यवसाय चालवणे अवघड असते, हे दत्ताभाऊ चांगलेच जाणून आहेत. त्यामुळे स्वतःचे व्यवसाय सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना साहेबांशी ‘जुळवून’ (तडजोड) घ्यावे लागत असल्याची उघड चर्चा पक्षात आहे.
‘गाव जले हनुमान बाहर’: वादाला पहिली ठिणगी कुठे पडली?
आता हा सगळा ‘महाभारत’ अचानक पेटला कसा? तर याचे मूळ १५ दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेत आहे.
भाजपचे संपर्कमंत्री जयकुमार गोरे हे १५ दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने धाराशिवला आले होते. त्यावेळी आमदार राणा पाटील यांनी भाजपचे प्रदेश सदस्य ॲड. अनिल काळे यांचा उघडपणे अपमान केला आणि त्यांना जयकुमार गोरे यांना भेटूच दिले नाही!
इथून जुन्या निष्ठावंतांच्या खदखदीला सुरुवात झाली. या अपमानाचा बदला घेण्यासाठी मग ॲड. गुंड यांनी नवनिर्वाचित भाजप आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आणि तिथे ही खदखद ज्वालामुखीसारखी बाहेर पडली.
-
याच मंचावरून माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी साहेबांना ठणकावून सांगितले: “भाजप हा कोणत्या एका कुटुंबाचा पक्ष नाही, तर भाजप हेच आमचे कुटुंब आहे!”
-
त्याला प्रत्युत्तर म्हणून साहेबांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी “राणा पाटलांमुळेच जिल्ह्यात भाजप आहे,” असे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले, ज्याने आगीत थेट पेट्रोल ओतले!
-
आणि या आगीच्या लोळातच ६ महिन्यांत ३ भाजयुमो अध्यक्ष बदलण्याचा (गणेश इंगळगी यांची नियुक्ती) साहेबांनी विक्रम केल्याने युवा कार्यकर्त्यांचाही बांध फुटला!
थोडक्यात सांगायचे तर, मंत्रीपदाची हुलकावणी लागलेले साहेब आता स्वतःचा राग पक्षावर काढत आहेत, तडजोडीचे राजकारण करणारे दत्ताभाऊ सँडविच होत आहेत आणि अनिल काळेंच्या अपमानावरून सुरू झालेला हा वणवा आता थेट पक्षाच्या मुळावर उठला आहे. आता या राजकीय ‘कुरुक्षेत्रात’ पुढचा अध्याय काय असेल? हे लवकरच स्पष्ट होईल!





