धाराशिव: म्हणतात ना, “जुन्या काळी भिंतीला कान असायचे, पण आता मेलला ‘सीसी’ (CC) असतात!” याचाच प्रत्यय सध्या धाराशिवच्या राजकारणात येत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण जिंकलं, कोण हरलं यापेक्षा सध्या चर्चा रंगली ती भाजपच्या ‘टेक्नॉलॉजी सेल’च्या एका भन्नाट कारनाम्याची!
सहलीचे राजकारण आणि ‘पळवापळवी’
झाले असे की, जिल्हा परिषदेचे निकाल लागले. भाजपने १९, शिंदे गटाने १५ (त्यात ८ तानाजीरावांचे ‘स्पेशल’), आणि बाकीच्यांनी आपली किरकोळ जमापुंजी गोळा केली. आता अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी ‘लागीरं झालं जी’ सुरू झालं आहे. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ३१ सदस्यांना कोकणात ‘थंड हवा’ खायला नेले. आता कोकणात हवा थंड असली तरी धाराशिवमध्ये वातावरण गरम झालं.
शिंदे गटाचे अजित खोत यांनी ओरड सुरू केली, “अहो, आमचे दोन गडी पळवले! हे राणादादांनी काय चालवलंय?” खोतांनी असाही आरोप केला की, प्रभारी जिल्हाप्रमुख अजित पिंगळे हे तर भाजपच्या दावणीलाच बांधलेत.
‘मेल’चा घोळ आणि ‘बोलविता धनी’
आता खरा ड्रामा इथून सुरू होतो. अजित खोतांच्या आरोपांना उत्तर द्यायचे ठरले. नेहमीप्रमाणे राणादादांची ‘स्टाईल’ असते— बाण आपला, पण खांदा दुसऱ्याचा! यावेळी खांदा निवडला गेला भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचा.
उतर म्हणून एक कडक प्रेस नोट तयार झाली. विषय होता— “तानाजी सावंतांनी केला महायुतीचा विश्वासघात!”
पण इथेच माशी शिंकली… नव्हे, ‘मेल’ शिंकला!
जी प्रेस नोट जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या नावाने प्रसिद्ध व्हायला हवी होती, ती चुकून थेट ‘आमदार राणाजगजितसिंह पाटील’ यांच्या पर्सनल मेल आयडीवरून पत्रकारांना धडकली!




चार मेलची ‘मेल-खेळ’
१. पहिला मेल: राणादादांच्या अधिकृत मेलवरून आला. त्यात तानाजी सावंतांवर तोफ डागलेली, पण सही दत्ता कुलकर्ण्यांची! पत्रकारांना प्रश्न पडला, “हे नक्की बोलतंय कोण?”
२. दुसरा मेल: ५ मिनिटांत भाजपच्या आयटी सेलला चूक उमजली. धाडकन दुसरा मेल आला— “सॉरी हं! मघाचा मेल चुकून आलाय, तो डिलीट करा.” (जणू काय पत्रकारांच्या डोक्यातून पण तो डिलीट होणार होता!)
३. तिसरा मेल: स्पष्टीकरण आलं— “अहो, दोन्ही मेल आयडी ओपन होते, गडबडीत राणादादांच्या मेलवरून ‘सेंड’ बटन दाबले गेले. आता खरी प्रेस नोट पाठवतोय.”
४. चौथा मेल: शेवटी भाजपच्या अधिकृत मेल आयडीवरून तीच प्रेस नोट पुन्हा आली. मजकूर तोच, आरोप तेच, फक्त यावेळी ‘सेंड’ करणारे वेगळे!


निष्कर्ष: ‘प्यादे’ पुढे, पण सूत्रधार उघडे!
या ‘डिजिटल’ गोंधळामुळे एक गोष्ट मात्र लख्ख प्रकाशझोतात आली. तानाजी सावंतांवर आगपाखड करणारे शब्द जरी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचे असले, तरी त्या शब्दांची ‘स्क्रिप्ट रायटिंग’ आणि ‘डायरेक्शन’ थेट राणादादांचीच आहे, हे त्या एका चुकीच्या ‘क्लिक’ने जगजाहीर केले.
तिकडे तानाजीरावांनी भूम-परंड्यात वेगळी चूल मांडली, इकडे राणादादांनी सदस्यांना कोकण दाखवले, आणि या सगळ्यात ‘जी-मेल’ ने मात्र भाजपची चांगलीच ‘पोलखोल’ केली.
त्यामुळे सध्या धाराशिवच्या कट्ट्यावर एकच चर्चा आहे— “राजकारण करायचं तर नीट करा, पण निदान मेल पाठवताना ‘लॉग आऊट’ तरी करा!”





