कळंब: तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रात नृत्याचा कार्यक्रम पाहून परतत असताना, मागील भांडणाच्या रागातून केज तालुक्यातील एका तरुणाचा त्याच्याच मित्रांनी निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (दि. १२) ही घटना घडली असून, याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संशयित आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सतीश भागवत मुंडे (वय ३७, रा. साळेगाव, ता. केज, जि. बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सतीशचे वडील भागवत मुंडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश मुंडे आणि त्याचे सहकारी मित्र गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चोराखळी येथील महाकाली कलाकेंद्रात नृत्य पाहण्यासाठी गेले होते. मध्यरात्री एक वाजेपर्यंत ते तिथेच होते. मात्र, परतत असताना मागील भांडणाच्या कारणावरून सोबत असलेल्या पाच जणांनी सतीशचा खून केला.
धक्कादायक बाब म्हणजे, खून केल्यानंतर आरोपींनी सतीशचा मृतदेह घरी आणला. “त्याला खूप झोप लागली आहे, तो उठतच नाही,” असे त्याच्या घरच्यांना सांगून त्यांनी तिथून पळ काढला. संशय आल्याने वडिलांनी सतीशला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला तपासाअंती मृत घोषित केले.
पाच जणांवर गुन्हा दाखल
मयत सतीशच्या वडिलांच्या फिर्यादीवरून शेख मुन्ना शेख जिलानी, शेख रौफ, संजय गीते, मधुकर इंगळे आणि दत्ता तोंडे (सर्व रा. साळेगाव, ता. केज) या पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सीसीटीव्हीत संशयास्पद हालचाली
कला केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सतीश आणि त्याचे सहकारी तिथे असताना काहीतरी गडबड सुरू असल्याचे दिसून आले आहे. भांडण नेमके कोणासोबत झाले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, कला केंद्रांच्या परिसरात होणारी भांडणे आणि गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.






