ढोकी: शेतातील हरभरा पिकाची चोरी करण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून एका ६५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड आणि कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील गोपाळवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील सात जणांवर भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू भैरू मिसाळ (वय ६५, रा. गोपाळवाडी) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. ही घटना १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास कसबे तडवळे शिवारातील गट नंबर ८७९ मध्ये घडली.
नेमकी घटना काय?
बापू मिसाळ हे आपल्या शेतात गेले असता, आरोपी हे त्यांच्या शेतातील हरभरा पिकाची चोरी करत होते. मिसाळ यांनी त्यांना हटकले असता, आरोपींना याचा राग आला. त्यांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मिसाळ यांच्यावर कुऱ्हाड, कोयता आणि फायटरने जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी गमज्याने (गमचा) मिसाळ यांचा गळा आवळून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
या मारहाणीदरम्यान आरोपींनी मिसाळ यांच्या हातातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतली. तसेच, “पोलिसात तक्रार केली तर तुमच्यावर ॲट्रासिटीचा खोटा गुन्हा दाखल करू,” अशी धमकीही दिली.
या प्रकरणी बापू मिसाळ यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून खालील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१. धनाजी गोवर्धन काळे २. विष्णू धनाजी काळे ३. शंकर धनाजी काळे ४. गोरख धनाजी काळे ५. राणीबाई सुखदेव पवार ६. शितल शंकर काळे ७. सीताबाई गोरख काळे (सर्व रा. गोपाळवाडी, ता. जि. धाराशिव)
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ढोकी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११८(१), ११९(१), ६२, ३५१(२), ३५१(३), १८९, १८९(२), १९०, १९१(२) आणि १९१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.




