धाराशिव : कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरांची निर्दयीपणे आणि बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्यांवर धाराशिव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. जिल्ह्यातील वाशी आणि भूम तालुक्यात २३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री उशिरा या कारवाया करण्यात आल्या. चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता जनावरांना क्रूरपणे वाहनात कोंबून नेणाऱ्या दोघांवर संबंधित पोलीस ठाण्यांत ‘प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम’ आणि ‘पशु संरक्षण अधिनियमा’अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-
वाशी : पिकअपमधून तीन बैलांची वाहतूक
वाशी तालुक्यातील सरमकुंडी फाटा येथे २३ फेब्रुवारी रोजी रात्री पावणे बाराच्या (२३:४५) सुमारास पोलिसांनी एका पिकअपला (क्र. MH 13 DQ 1656) अडवले. या वाहनाची तपासणी केली असता, त्यात ७५,००० रुपये किमतीचे गोवंशीय जातीचे तीन बैल आढळून आले. कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या या जनावरांच्या चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता त्यांना निर्दयीपणे कोंबण्यात आले होते. याप्रकरणी वाशी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन आरोपी गौतम मधुकर गायकवाड (वय २६, रा. तांदुळवाडी, ता. वाशी) याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१), ११(१)(अ), ११(१)(एच), ११(१)(एफ), ११(१)(आय) सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम ५(ए), ५(ब), ९(ब), ११ आणि प्राण्यांचे परिवहन अधिनियम ४७, ५४, ५६ अन्वये वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
-
भूम : ८ गोवंशीय जनावरांची सुटका
दुसरी कारवाई भूम तालुक्यातील भोनगिरी येथे २३ फेब्रुवारी रोजी रात्री १०:०८ वाजता करण्यात आली. पोलिसांनी एका वाहनाची तपासणी केली असता, त्यात ३ जर्सी कालवड, १ खोंड, १ जर्सी गाय, २ गावरान गाईचे खोंड आणि १ काळ्या रंगाची कालवड अशी एकूण ८ गोवंशीय जनावरे (किंमत ४६,००० रुपये) आढळून आली. या जनावरांचीही चारा-पाण्याविना कत्तलीसाठी अत्यंत क्रूरपणे वाहतूक केली जात होती. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी खलील हाफीज खॉ पठाण (रा. भोनगिरी, ता. भूम) याच्यावर भूम पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(फ) आणि ११(१)(एच) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.





