धाराशिव: शहरातील तुळजापूर नाका परिसरातील एका वॉशिंग सेंटरमधून अज्ञात चोरट्याने वॉशर मशीन आणि टुलकिटसह एकूण ४५ हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन शिवाजी पवार (वय २६, रा. शिंदेवाडी, ता. जि. धाराशिव) यांचे तुळजापूर नाका येथील हंबीरे पेट्रोल पंपाजवळ वॉशिंग सेंटर आहे. रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास सचिन पवार आपले वॉशिंग सेंटर बंद करून गावी गेले होते.
या कालावधीत अज्ञात चोरट्याने बंद सेंटरचा फायदा घेत आतील वॉशर मशीन आणि एक टुलकिट असा एकूण ४५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
सेंटरमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन पवार यांनी सोमवार, दि. ९ मार्च रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३४(१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
उमरगा: लातूर रोडवरून रिक्षा आणि मोबाईलची चोरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास
उमरगा –रस्त्याच्या कडेला रिक्षा उभी करून नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या चालकाची रिक्षा आणि मोबाईल अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची खळबळजनक घटना उमरगा शहरात घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी किरण भास्करराव बारुळकर (वय ५३ वर्ष, रा. बालाजी नगर, उमरगा) हे ५ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास आपली रिक्षा घेऊन लातूर रोडने जात होते. बिरुदेव मंदिराजवळ त्यांनी आपली अजाज कंपनीची रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी केली आणि ते नैसर्गिक विधीसाठी थांबले.
या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने १,५०,००० रुपये किमतीची रिक्षा आणि ५,००० रुपयांचा मोबाईल फोन, असा एकूण १,५५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
गुन्हा दाखल
रिक्षा चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर किरण बारुळकर यांनी ९ मार्च २०२६ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. भरदिवसा मुख्य रस्त्यावरून रिक्षा चोरीला गेल्यामुळे रिक्षा चालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.





