धाराशिव जिल्हा परिषदेत सध्या ‘महिलाराज’ अवतरलंय. पण हे महिलाराज म्हणजे महिला सक्षमीकरणाचा भाग आहे, या भाबड्या आशेवर जर कुणी सामान्य कार्यकर्ता असेल, तर त्याने आधी डोळ्यावरची पट्टी काढावी. भाजप आणि शिंदे सेनेची मस्तपैकी दिलजमाई झाली, महायुतीने ४५ विरुद्ध ९ असा दणदणीत विजयही मिळवला. पण विजयाच्या या गुळाच्या ढेपीला मुंगळे कोण चिकटणार? तर अर्थातच ‘साहेबांच्या’ सौभाग्यवती!
घराणेशाहीवर कीर्तन, आणि घरातच ‘फॅमिली पॅक’ दर्शन
सगळ्यात भारी कमाल केलीये ती शिंदे सेनेचे नेते आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी. हेच साहेब जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा ‘घराणेशाही’ या शब्दावर तासनतास प्रवचन द्यायचे आणि घसा कोरडा करायचे. पण सत्तेत आल्यावर साहेबांची ‘स्कीम’च बदलली! चिरंजीव किरण गायकवाड यांना उमरगा नगरपालिकेचे अध्यक्षपद दिलं आणि आता पत्नी उषाताई गायकवाड यांना थेट जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवलं. साहेबांचा हा ‘राजकीय फॅमिली पॅक’ बघून सामान्य कार्यकर्त्यांना नक्कीच भोवळ आली असेल. थोडक्यात काय, तर दुसऱ्यांना सांगायचे ब्रह्मज्ञान आणि स्वतःच्या कुटुंबासाठी मात्र सगळीच पदे महान!
खासदारकी हुकली तर काय झालं? ‘पुनर्वसन’ योजना आहे ना!
दुसरीकडे, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही ‘पराभूतांचे पुनर्वसन’ ही आपली राजकीय परंपरा अत्यंत इमानेइतबारे जपली आहे. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अर्चनाताई पाटील यांचा पराभव झाला. पण म्हणून काय त्यांना घरी बसवणार का? अजिबात नाही! दिल्लीची खुर्ची मिळाली नाही तर काय झालं, आपल्या हक्काची धाराशिव झेडपीची अध्यक्षपदाची खुर्ची तर आहेच की! लगेच अर्चनाताईंना त्या खुर्चीवर मोठ्या थाटामाटात विराजमान करण्यात आलं.
कार्यकर्त्यांनो, सतरंज्या झटकण्याची प्रॅक्टिस चालू ठेवा!
आता या सगळ्या ‘हॅपी फॅमिली’च्या गोड चित्रात आपला सामान्य कार्यकर्ता कुठे आहे? तर तो अजूनही सतरंज्या झटकण्यात, साहेबांच्या गाड्या पुसण्यात आणि ‘आमचा नेता कसा, वाघासारखा जसा’ अशा घोषणा देण्यात बिझी आहे. कार्यकर्त्यांनी उन्हा-तान्हात राबायचं, घाम गाळायचा आणि सत्ता आल्यावर साहेबांच्या पत्नी, मुले, पुतणे यांनी थेट मलाई खायची, हाच धाराशिवच्या राजकारणाचा नवा आणि ‘अधिकृत’ पॅटर्न झाला आहे.
त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांनो, तुम्ही फक्त ‘सायेबsss’ म्हणून गळे काढा आणि सतरंज्या अंथरायची प्रॅक्टिस आणखी जोमाने चालू ठेवा. कारण सत्तेची फळे ‘घराण्याच्या’ बाहेर जाणार नाहीत, हेच इथलं एकमेव सत्य आहे!







