धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपकडून अर्चना पाटील यांची अध्यक्षपदी, तर शिवसेनेच्या (शिंदे गट) उषाताई गायकवाड यांची उपाध्यक्षपदी बहुमताने निवड झाली असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. मात्र, या विजयानंतर भाजपच्या आणि विशेषतः राणा पाटील समर्थकांनी जो उन्माद घातला, त्याने धाराशिव पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत.
सत्ताधाऱ्यांना कायदा माफ आहे का?
महापुरुषांचा जयंती उत्सव साजरा करताना सर्वसामान्य तरुणांनी डॉल्बी लावली, तर पोलिसांना लगेच कायद्याची आठवण होते. डॉल्बीवर बंदी घालून थेट मशिन्स जप्त केल्या जातात आणि हजारो रुपयांचा दंड आकारला जातो. मग सत्ताधारी मंडळींना हा कायदा माफ आहे का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच धिंगाणा
जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून धाराशिव-येडशी हा मुख्य रस्ता जातो. विजयाच्या उन्मादात या रस्त्यावर चक्क विनापरवाना डॉल्बी लावून, जेसीबी लावून गुलाल उधळत आणि कानठळ्या बसवणारे फटाके फोडत कार्यकर्त्यांनी डान्स केला. एवढेच नाही तर ‘राणा दादा’ आणि ‘रडू नको बाळा’ ही गाणी लावून विरोधकांना जाणीवपूर्वक खिजवण्याचा प्रकारही घडला. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा सर्व प्रकार सुरू असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत होते.
आनंदनगर पोलीस आणि एसपी मॅडम गप्प का?
सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, विनापरवाना डॉल्बी आणि जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी फटाके फोडले जात असताना आनंदनगर पोलीस गप्प का? जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या एसपी मॅडम यांना हा प्रकार दिसला नाही का? सत्तेची हवा डोक्यात गेलेल्या या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची हिंमत खाकी वर्दी दाखवणार का?
कलेक्टर साहेब, तो न्याय आता कुठे गेला?
काही दिवसापूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची बदली झाल्यानंतर एका अज्ञात इसमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फटाके फोडले होते. त्यावेळी प्रशासनाने प्रचंड तत्परता दाखवत तत्काळ गुन्हा दाखल केला होता. मग आता तोच कायदा आणि तोच न्याय कुठे गेला? आता पोलीस गप्प का आणि खुद्द कलेक्टर साहेबही गप्प का? सत्तेच्या दबावाखाली प्रशासनाची कारवाईची धार बोथट झाली आहे का, याचे उत्तर आता धाराशिवच्या जनतेला हवे आहे.
-
जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व; अर्चना पाटील अध्यक्ष तर उषाताई गायकवाड उपाध्यक्ष.
-
विजयाच्या उन्मादात जिल्हाधिकारी आणि झेडपीसमोर विनापरवाना डॉल्बी आणि फटाक्यांची आतषबाजी.
-
विरोधकांना डिवचण्यासाठी ‘राणा दादा’ आणि ‘रडू नको बाळा’ गाण्यांचा दणदणाट.
-
जयंतीला कारवाई करणारे आनंदनगर पोलीस आणि एसपी मॅडम आता गप्प का?






