बेंबळी: विनाकारण किरकोळ वाद उकरून काढून एका शेतकऱ्याच्या शेतातील हरभऱ्याच्या पिकाला आग लावल्याची संतापजनक घटना धाराशिव तालुक्यातील विठ्ठलवाडी शिवारात उघडकीस आली आहे. या आगीत शेतकऱ्याचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध श्रीरंग कसपटे (वय ३२, रा. विठ्ठलवाडी, ता. जि. धाराशिव) यांच्या मालकीचे विठ्ठलवाडी शिवारात शेत आहे. ६ मार्च रोजी रात्री पावणेदहा ते ७ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. गावातीलच अमोल आबार आणि जगताप या दोघांनी अनिरुद्ध यांच्यासोबत विनाकारण किरकोळ कारणावरून वाद घातला आणि भांडण केले. याच वादाचा राग मनात धरून या आरोपींनी अनिरुद्ध कसपटे यांच्या शेतातील हरभऱ्याच्या पिकाला आग लावली.
या आगीत हरभरा जळून खाक झाला असून, यात फिर्यादीचे अंदाजे ७० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेनंतर अनिरुद्ध कसपटे यांनी १४ मार्च रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या या प्रथम खबरेवरून अमोल आबार आणि जगताप (दोघेही रा. विठ्ठलवाडी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२६ (एफ) आणि ३२४ (४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.





