शिराढोण : कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथून एका १२ वर्षीय मुलाचे भरदुपारी अज्ञाताने अपहरण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रविवारी (ता. १५) शिराढोण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करणकुमार बबलु राय (वय १२, सध्या रा. भाटशिरपुरा, ता. कळंब. मूळ रा. दुधैला मनेरणा, जि. पाटणा, बिहार) असे अपहरण झालेल्या या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील बबलु रामभवन राय (वय ३७) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बबलु राय हे मूळचे बिहार राज्यातील रहिवासी असून, ते सध्या उपजीविकेसाठी कुटुंबीयांसह भाटशिरपुरा येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी (ता. १४) दुपारी दीड वाजेच्या (१३.३० वा.) सुमारास त्यांचा मुलगा करणकुमार हा गावातीलच दिनेश सूर्यकांत वाघमारे यांच्या घरी होता. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याला तेथून पळवून नेले.
मुलगा बेपत्ता असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याचा आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही. अखेर आपला मुलगा हरवला नसून त्याला कोणीतरी पळवून नेल्याची खात्री झाल्यानंतर बबलु राय यांनी रविवारी (ता. १५) शिराढोण पोलिस ठाण्यात धाव घेतली.
त्यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून शिराढोण पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण असून, शिराढोण पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी चौकशी सुरू आहे.






