धाराशिव : खासदार ओमराजे निंबाळकर हे लोकसभेत जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडत असून, त्यांच्या कामामुळे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पोटात दुखत आहे. आमदार पाटील यांना केवळ फुकटचे श्रेय लाटण्याची सवय असून, उद्या एखाद्या नवीन जोडप्याला मूल जन्माला आले, तरी त्याचेही श्रेय ते घेतील इतकी खालची पातळी त्यांनी गाठली आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी केली आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच लोकसभेत रेल्वेचा प्रश्न मांडून निधीची मागणी केली होती. त्यावर भाजप व आमदार राणा पाटील यांच्या गोटातून प्रतिक्रिया देत ओमराजेंवरच खोडा घालत असल्याचा आरोप करण्यात आला होता. याला चोख प्रत्युत्तर देताना सोमनाथ गुरव यांनी राणा पाटलांवर सडकून टीका केली.
काय म्हणाले सोमनाथ गुरव?
-
श्रेयवादाचा अट्टाहास: राणा पाटील गेल्या दहा वर्षांपासून तुळजापूरचे आमदार आहेत, सत्तेत आहेत, मात्र त्यांनी कधीही सभागृहात जनतेचे प्रश्न मांडले नाहीत. दुसऱ्यांच्या कामात खोडा घालणे आणि स्थगिती देणे हाच त्यांचा खरा व्यवसाय आहे. कशाचेही श्रेय आपल्यालाच मिळाले पाहिजे, हा त्यांचा अट्टाहास आहे.
-
हुकूमशाही मानसिकता: जिल्ह्यात जे काही होईल ते फक्त राणा पाटलांच्या मर्जीनेच व्हायला हवे, अशी भाजपची आणि त्यांची विकृत मानसिकता आहे. ओमराजेंच्या रेल्वे प्रश्नावर दिलेली प्रतिक्रिया याच मानसिकतेचे दर्शन घडवते.
-
पराभवाची आठवण: जनतेचा तुमच्यावर एवढाच विश्वास असता, तर तुमच्या पत्नीला लोकसभा निवडणुकीत ३ लाख २९ हजार मतांच्या फरकाने दारुण पराभवाचा सामना करावा लागला नसता. त्यामुळे राणा पाटलांनी विकासावर बोलण्याची नैतिकता गमावली आहे.
२०१४ ते २०१९ मध्ये तुमचे हात कोणी बांधले होते?
रेल्वेच्या प्रश्नावर बोलताना गुरव यांनी राणा पाटील यांना थेट आव्हान दिले. २०१४ ते २०१९ या काळात राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि तुमचाच खासदार होता; मग तेव्हा किती रुपयांचे काम झाले याचे उत्तर आधी द्यावे. तेव्हा तुमचे हात कुणी बांधले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. २०१९ मध्ये ओमराजे खासदार झाल्यानंतरच त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळेच आज कामे मार्गी लागताना दिसत आहेत.
ओमराजेंवर कोल्हेकुईचा फरक पडणार नाही
खासदार ओमराजे हे जनतेच्या जीवावर राजकारण करतात व जनतेसाठीच काम करतात. त्यामुळे राणा पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी कितीही ‘कोल्हेकुई’ केली तरी ओमराजेंच्या कामावर त्याचा कोणताही फरक पडणार नाही. राणा पाटील यांनी ‘आपल्याशिवाय जगात कुणाला काही कळत नाही’ हा अविर्भाव आता सोडून द्यावा, असा सज्जड दमही सोमनाथ गुरव यांनी शेवटी दिला.







