जेव्हा आरसा सत्य दाखवतो, तेव्हा विद्रूप चेहरा असलेले लोक आरसाच फोडायला निघतात. तुळजापूरच्या बाबतीत नेमकं हेच घडत आलंय. ‘धाराशिव लाईव्ह’ने गेल्या वर्षभरापासून तुळजापूरमधील ड्रग्ज, जुगार, मटका आणि देहविक्रीचे काळे धंदे पुराव्यानिशी वेशीवर टांगले, तेव्हा सत्ताधारी भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना अचानक ‘तुळजापूरच्या बदनामी’चा साक्षात्कार झाला होता. थेट नागपूर अधिवेशनात या ‘बदनामी’ करणाऱ्या माध्यमांवर कारवाई करण्याची डरकाळी त्यांनी फोडली होती. पण दादा , आता काय बोलाल? आता तर तुमच्याच पक्षाच्या, थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांनीच ‘तुळजापूरमध्ये अवैध धंदे सुरू आहेत’ असा टाहो फोडत पोलिसांना ठिय्या आंदोलनाचा इशारा दिलाय. आता सांगा, तुळजापूरची बदनामी आम्ही करत होतो, की तुमचेच पदाधिकारी करताहेत?
गंमत म्हणजे, जे नगराध्यक्ष विनोद ऊर्फ पिंटू गंगणे आज आई तुळजाभवानीच्या पावन नगरीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवरून पोलिसांना थेट ‘मूळ मालकांवर कारवाई करा’ असे डोस पाजत आहेत, त्यांचाच ‘बायोडेटा’ आधी तपासून पाहण्याची गरज आहे. हे तेच गंगणे आहेत ज्यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आरोपी म्हणून चक्क महिनाभर जेलची हवा खाल्ली आहे. आणि त्याहून मोठा राजकीय विनोद म्हणजे, अशा गंभीर आरोपाखालील नेत्याला खुद्द भाजपनेच नगराध्यक्षपदाचे तिकीट दिले आणि निवडूनही आणले. कालपर्यंत जे स्वतः ड्रग्जच्या आरोपाखाली गजाआड होते, ते आज मटका, जुगार आणि देहविक्रीच्या विरोधात नीतिमत्तेचे धडे देत रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत! ‘सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली’ यापेक्षा दुसरं चपखल उदाहरण ते कोणतं?
आता प्रश्न असा पडतो की, राज्यात आणि केंद्रात सत्ता तुमची, राज्याचे गृहमंत्री तुमचे, इथले आमदार तुमचे आणि स्थानिक नगरपरिषदेवरही सत्ता तुमचीच! तरीही पोलिसांवर कारवाईसाठी दबाव का आणावा लागतोय? एका महिन्यापूर्वी भाजपच्याच नगरसेविका (नगराध्यक्षांच्या भावजय) प्रियंका गंगणे यांनी पोलिसांना निवेदन दिले होते, तरीही हे धंदे बंद झाले नाहीत. आता स्वतः नगराध्यक्ष आणि गटनेते चंद्रकांत कदम पोलिसांना ‘तत्काळ कारवाई करा, अन्यथा ठिय्या देऊ’ असा इशारा देत आहेत. सत्ताधाऱ्यांनाच जर आपल्याच पोलिसांसमोर धरणे धरावे लागत असेल, तर याला सत्तेचा पंगूपणा म्हणायचा की जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारी राजकीय नौटंकी?
आई तुळजाभवानीच्या या पवित्र नगरीला खऱ्या अर्थाने गालबोट कोण लावतंय, हे आता लपून राहिलेलं नाही. अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत आणि त्यात केवळ एजंट नव्हे तर ‘मोठे मालक’ गुंतलेले आहेत, हे सत्य आता खुद्द भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी अधिकृत निवेदनाद्वारे मान्य केले आहे. त्यामुळे आमदार राणा पाटील यांनी आता सत्य समोर आणणाऱ्यांना दोष देण्याऐवजी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. सत्य बाहेर आणणाऱ्या मीडियाचा आवाज दाबून शहराची इभ्रत वाचवता येत नसते, तर त्यासाठी पक्षातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना आणि त्यांच्या छत्राखाली फोफावलेल्या अवैध धंद्यांना ठेचावे लागते.
तुळजापूरचे पोलीस निरीक्षक हे राणा पाटील यांच्या ताटाखालील मांजर आहेत तर उपविभागीय पोलीस अधिकारी हे बोका आहेत. त्यांच्या आशिर्वदामुळे तुळजापूर नगरीमध्ये अवैध धंदे बोकाळले आहेत. विशेष म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप असताना, त्यांना एक वर्षे मुदतवाढ कश्यासाठी देण्यात आली, याचे उत्तर खुद्द राणा पाटील यांनाच माहित आहे.
राणा पाटील, जनता उघड्या डोळ्यांनी सगळं पाहतेय… आता तरी सांगा, तुळजापूरची बदनामी नक्की कोण करतंय? आणि हो, आता गंगणे यांच्या इशाऱ्यानंतर तरी तुमच्या पोलिसांना जाग येणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह





