‘माऊली’ अर्थात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी टाकलेले ते एक व्हॉट्सॲप स्टेटस आता धाराशिव भाजपच्या मुळावर उठले आहे. निष्ठावंतांच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी, या स्टेट्सने आगीत थेट तेल ओतण्याचे काम केले. “३० वर्षांत तुमचं योगदान काय?” या एका प्रश्नाने निष्ठावंतांच्या जिव्हारी असा काही घाव घातलाय, की आता ही आग विझवणे भल्याभल्यांच्या हाताबाहेर गेले आहे.
संघाचा हिरमोड: “आपला प्रचार व्यर्थच गेला की काय?”
या सगळ्या राड्यात सर्वाधिक कुणाचे खच्चीकरण झाले असेल, तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपच्या जुन्या, मुळातील कार्यकर्त्यांचे. ज्यांनी ऊन-पावसाची तमा न बाळगता, दारोदारी जाऊन पक्षाचा विचार रुजवला, त्यांना आता “तुमच्यामुळे नाही, तर आमच्या साहेबांमुळे पक्ष वाढला,” असे ऐकून घेण्याची वेळ आली आहे. आपला एवढ्या वर्षांचा निष्काम प्रचार व्यर्थच गेला की काय, अशी उद्विग्न भावना आता संघ परिवारात निर्माण झाली आहे.
विनोद गपाट यांचा ऐतिहासिक ‘दे दणादण’!
अर्चना पाटील यांच्या या व्हॉट्सॲप स्टेटसला प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद गपाट यांनी पुराव्यांसहित आणि ऐतिहासिक आकडेवारीसह असे काही सडेतोड उत्तर दिले आहे, की राणा समर्थकांची बोलतीच बंद झाली.
गपाट यांनी थेट भूतकाळच उकरून काढला आणि आठवण करून दिली:
-
“इतिहास विसरलात का? मागील ९ लोकसभा निवडणुकांपैकी तब्बल ७ निवडणुका शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या आहेत.”
-
“२००१ मध्ये जेव्हा डॉ. साहेब आणि चव्हाण साहेब मंत्री होते, तेव्हाच जिल्ह्यात ४ नगर परिषदा, ४ पंचायत समित्या आणि थेट जिल्हा परिषद युतीने जिंकली होती!”
-
“युतीचे कायम २/३ आमदार जिल्ह्यातून निवडून येतात. त्यामुळे हे यश कोणा एका व्यक्तीचे किंवा घराण्याचे नाही, तर युतीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचे आणि पक्षाचे आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावे!”
थोडक्यात, “तुम्ही येण्यापूर्वीही इथे कमळ फुलत होतं आणि भगवा फडकत होता,” याची सणसणीत चपराक गपाट यांनी लगावली आहे.
स्क्रीनशॉट थेट ‘देवाभाऊंच्या’ दरबारात!
हा वाद आता फक्त धाराशिवपुरता मर्यादित राहिलेला नाही. अर्चना पाटील यांच्या त्या वादग्रस्त व्हॉट्सॲप स्टेटसचे स्क्रीनशॉट थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) आणि पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या मोबाईलवर धडकले आहेत. आता मुंबईत बसलेल्या वरिष्ठांसमोर एकच ‘कळीचा मुद्दा’ उभा राहिला आहे:
“भाजपमुळे राणा पाटील मोठे झाले, की राणा पाटलांमुळे भाजप मोठा झाला?”
गुरुवारचा ‘सुपर ओव्हर’: सुनील राणेंची एन्ट्री आणि राणांना ‘रायगड’चा धक्का!
धाराशिवमध्ये वाढलेली ही ‘नवा विरुद्ध जुना’ दुफळी आणि कार्यकर्त्यांमधील खदखद पाहता, अखेर पक्षाने याची गंभीर दखल घेतली आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि हा वाद मिटवण्यासाठी (किंवा कारवाई करण्यासाठी) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे गुरुवारी (उद्या) सायंकाळी ५ वाजता धाराशिवच्या दौऱ्यावर येत आहेत.
पण यात राणा पाटील यांच्यासाठी सर्वात मोठा आणि पहिला धक्का कोणता असेल?
तर, ही महत्त्वाची बैठक राणा पाटील यांच्या अधिकृत ‘भवन’मध्ये (कार्यालयात) न होता, थेट ‘रायगड फंक्शन हॉल’ या तटस्थ ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे!
वरिष्ठांनी बैठकीचे ठिकाण बदलून राणा गटाला एक स्पष्ट ‘सिग्नल’ दिला आहे की, पक्ष कुणाच्याही दावणीला बांधलेला नाही. आता सुनील राणे यांच्या उपस्थितीत रायगड फंक्शन हॉलमध्ये नक्की काय शिजतंय? निष्ठावंतांच्या भडक्यासमोर कुणाची विकेट पडते? आणि या बैठकीत कोणता नवा ‘राडा’ होतो? याकडे आता संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे डोळे लागून आहेत!
(पुढील भागात: रायगड फंक्शन हॉलमधील इनसाईड स्टोरी… वाचा लवकरच!)




