धाराशिव – धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेचे सहशिक्षण (Co-education) शाळेत रूपांतर करण्याच्या निर्णयास गावकरी आणि पालकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “शाळा एकत्रीकरण केल्यास शाळेला थेट टाळे ठोकू,” असा कडक इशारा सर्व पालकांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
शिक्षण आयुक्त, पुणे यांच्या ९ फेब्रुवारी २०२६ च्या पत्राचा संदर्भ देत, बेंबळी येथील जि. प. कन्या प्राथमिक शाळेचे रूपांतरण सहशिक्षणाच्या शाळेत (मुले-मुली एकत्र) करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, या निर्णयाला बेंबळी गावातील शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व पालकांनी कडाडून विरोध केला आहे. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालकांनी आज (दि. ३० मार्च) जिल्हाधिकाऱ्यांकडे एक लेखी निवेदन सुपूर्द केले.
पालकांनी निवेदनात मांडलेले प्रमुख आक्षेप:
शाळा एकत्रीकरणाच्या निर्णयामुळे मुलींच्या शिक्षणावर नकारात्मक परिणाम होईल अशी भीती पालकांनी व्यक्त केली असून खालील मुद्दे मांडले आहेत:
१) शाळेचे एकत्रीकरण केल्यास गावात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी होईल.
२) शासनाचे ‘मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्याचे’ जे मूळ उद्दिष्ट आहे, ते या निर्णयामुळे पूर्ण होणार नाही.
३) शाळा एकत्र केल्यास विद्यार्थ्यांची आणि विशेषतः विद्यार्थिनींची मोठी अडचण निर्माण होईल.
प्रशासनाला कडक इशारा:
गावातील सर्व पालक आणि ग्रामस्थांची अशी ठाम मागणी आहे की, बेंबळी येथील कन्या शाळा पूर्वीप्रमाणेच स्वतंत्र सुरू ठेवावी. प्रशासनाने या मागणीची दखल न घेता बळजबरीने शाळा एकत्रीकरण केल्यास शाळेला टाळे ठोकण्यात येईल. तसेच, यामुळे विद्यार्थ्यांचे जे काही शैक्षणिक नुकसान होईल, त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर उद्धव देडेकर, संतोष आणासाहेब, राजकुमार परदेशी, राधिका सय्यद, कोमल रसाळ, जयश्री लेंडवे यांच्यासह गावातील अनेक संतप्त पालकांच्या आणि ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता यावर जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे.






