तुळजापूर तालुक्यातील जळकोट गावामध्ये शेत रस्त्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून, प्रत्यक्षात कोणतेही काम न करता कागदोपत्री कामे पूर्ण झाल्याचे दाखवून लाखो रुपयांचा निधी हडपण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बोगस कामांची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी जळकोट येथील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन २७ मार्च २०२६ रोजी धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे.
जळकोट येथील रोहित राम कदम आणि चेतन राजेंद्र सोनटक्के या शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात रस्त्यांच्या कामातील गैरव्यवहाराचा पाढाच वाचला आहे. प्रशासकीय रेकॉर्डनुसार अनेक रस्ते मंजूर होऊन त्यांचे काम १२ महिन्यांत पूर्ण झाल्याची नोंद आहे, मात्र प्रत्यक्षात जागेवर रस्त्यांचे मजबुतीकरण झालेलेच नाही.


निवेदनात नमूद केलेली संशयास्पद कामे:
शेतकऱ्यांनी पुराव्या दाखल खालील ४ मुख्य रस्त्यांच्या कामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे:
-
कोळनूर पांढरी शिव ते आडवाट रस्ता (२ किमी): या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी १७ लाख ९३ हजार रुपये मंजूर केले होते. १८ मार्च २०२१ रोजी काम सुरू होऊन १२ महिन्यांत पूर्ण झाल्याची नोंद आहे.
-
जळकोट बोरमन तांडा ते जळकोटवाडी नळ शेतरस्ता (२ किमी): यासाठी २४ लाख २५ हजार रुपये मंजूर झाले होते. १३ जुलै २०२१ ला काम सुरू करून तेही पूर्ण झाल्याचे दाखवले आहे.
-
मुरटा रस्ता ते वाड्यावरची आई रस्ता (शिवरस्ता): या कामासाठी १७ लाख ९३ हजार रुपये मंजूर होते. ११ जुलै २०२० रोजी काम सुरू झाल्याची नोंद आहे.
-
जळकोट हंगरगा डांबरीकरण ते नारायण पटणे शेत रस्ता (२ किमी): यासाठी २४ लाख ४ हजार रुपये मंजूर केले होते. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी काम सुरू करून ते पूर्ण झाल्याची कागदोपत्री नोंद आहे.
दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
लाखो रुपयांचा निधी खर्चूनही वरीलपैकी एकाही रस्त्याचे मजबुतीकरण झालेले नाही. काम न करताच काम पूर्ण केल्याचे दाखवून शासनाची आणि शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व कामांची तातडीने पाहणी करावी, रस्त्यांचे नमुने (सॅम्पल) घ्यावेत आणि या भ्रष्टाचारात सामील असणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या निवेदनावर जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती तुळजापूर आणि जि. प. सामान्य प्रशासन विभाग (धाराशिव) यांच्या आवक शिक्क्यांची नोंद असून, आता प्रशासन या भ्रष्टाचाराची दखल घेऊन काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे.





