वाशी : ‘तू गल्लीत येऊन सुनेला भेटतोस’, असे दुसऱ्या व्यक्तीला का सांगितलेस, याचा राग मनात धरून एका ३० वर्षीय तरुणावर तलवारीने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाशी (जि. धाराशिव) शहरात रविवारी (ता. २९) रात्री घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात एकावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय अच्युतराव क्षीरसागर (रा. साठेनगर, वाशी, ता. वाशी, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर, बाजीराव नानासाहेब जगताप (वय ३०, रा. शिंदे हॉस्पिटलच्या पाठीमागे, वाशी) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय क्षीरसागर हा गल्लीत येऊन त्यांच्या सुनेला भेटतो, अशी माहिती फिर्यादी बाजीराव जगताप यांनी महादेव क्षीरसागर यांना दिली होती. हीच बाब आरोपी विजय क्षीरसागर याला समजली आणि त्याला याचा राग आला. याच रागातून रविवारी (ता. २९) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास आरोपी विजयने बाजीराव जगताप यांना गाठले.
‘तू तसे का सांगितलेस’, अशी विचारणा करत आरोपीने सुरुवातीला बाजीराव यांना अर्वाच्य शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याने सोबत आणलेल्या तलवारीने बाजीराव यांच्यावर वार केले. या प्राणघातक हल्ल्यात बाजीराव जगताप हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, आरोपीने त्यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकीही दिली.
या थरारक घटनेनंतर बाजीराव जगताप यांनी सोमवारी (ता. ३०) वाशी पोलिस ठाण्यात जाऊन सविस्तर फिर्याद दिली. या प्रथम खबरीवरून पोलिसांनी आरोपी विजय क्षीरसागर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १०९, ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि भारतीय हत्यार कायदा (शस्त्र अधिनियम) कलम ४, २५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वाशी पोलिस करत आहेत. वाशी शहरात तलवारीने हल्ला झाल्याच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.




