बेंबळी : शेतातील रस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांना काठी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील टाकळी (बें) शिवारात घडली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वडिलांनाही यावेळी मारहाण करण्यात आली असून, याप्रकरणी तब्बल चौघांविरुद्ध बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव बळीराम सोनटक्के, महादेव दासा सोनटक्के, लक्ष्मण बळीराम सोनटक्के आणि बळीराम दासा सोनटक्के (सर्व रा. टाकळी बें., ता. जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी सूरज बापुराव डपळे (वय २३, रा. टाकळी बें.) यांनी बेंबळी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (ता. २७) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास टाकळी (बें) शिवारातील गट नंबर १९१ मधील सामाईक बांधावर हा प्रकार घडला. फिर्यादी सूरज डपळे आणि त्यांचे आजोबा दिगंबर डपळे हे तिथे असताना, शेतातील रस्त्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद उकरून काढला.
हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी सूरज आणि त्यांचे आजोबा दिगंबर यांना अर्वाच्य शिवीगाळ करत काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, हा राडा पाहून सूरज यांचे वडील बापुराव डपळे हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यास तिथे आले. मात्र, संतप्त आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली आणि सर्वांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर सूरज डपळे यांनी सोमवारी (ता. ३०) बेंबळी पोलिस ठाण्यात धाव घेत सविस्तर तक्रार दिली. या प्रथम खबरीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५१(२)(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलिस करत आहेत. गावातीलच दोन गटांत हा वाद झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे.




