तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पवित्र दिवशीच पोलिसांच्या ‘खाकी’ वर्दीचा संतापजनक माज पाहायला मिळाला आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या निरागस भाविकांना डीवायएसपी निलेश देशमुख यांनी बेदम मारहाण करत महिलांना धक्काबुक्की केल्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, राज्यभरातून पोलिसांच्या या दडपशाहीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
आज चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत. बाहेरगावाहून काही भाविक एका खाजगी लक्झरी बसमधून शहरात आले होते. मात्र, बस पार्किंगच्या एका क्षुल्लक कारणावरून या भाविकांचा आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचा वाद झाला.
हा वाद सुरू असतानाच घटनास्थळी डीवायएसपी निलेश देशमुख यांची एन्ट्री झाली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या या वरिष्ठ अधिकाऱ्याने परिस्थिती सामोपचाराने हाताळण्याऐवजी थेट कायदाच हातात घेतला. डीवायएसपी देशमुख यांनी रस्त्यावरच भाविकांना अक्षरशः बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सर्वात धक्कादायक आणि संतापाची बाब म्हणजे, यावेळी महिला भाविकांचाही सन्मान न राखता त्यांनाही अत्यंत वाईट पद्धतीने धक्काबुक्की करण्यात आली.
व्हिडिओमध्ये पोलिसांची गुंडगिरी कैद
रक्षकानेच भक्षकाची भूमिका घेतलेल्या या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये पोलिसांची हुकूमशाही आणि गुंडगिरी स्पष्टपणे दिसत आहे. एका पवित्र यात्रेच्या दिवशी भाविकांवर असा अमानुष लाठीचार्ज आणि मारहाण झाल्याने प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भाविकांचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
या भयंकर आणि अपमानास्पद प्रकारानंतर संतप्त झालेल्या भाविकांनी थेट तुळजापूर पोलीस ठाणे गाठले आहे. वर्दीचा गैरवापर करून सामान्य नागरिकांना मारहाण करणाऱ्या डीवायएसपी निलेश देशमुख आणि संबंधित पोलिसांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी भाविकांनी पोलीस ठाण्यातच ठाण मांडले आहे.
जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नसल्याची ठाम भूमिका भाविकांनी घेतली आहे. या घटनेमुळे तुळजापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आता राज्याचे गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी या मुजोर अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.






