धाराशिव – भाजपचे आमदार राणा पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी उद्या ६ एप्रिल २०२६ रोजी भाजप स्थापना दिनानिमित्त ‘माझा परिवार, भाजपा परिवार’ असे म्हणत कार्यकर्त्यांना आपापल्या घरावर भाजपचा झेंडा लावण्याचे आवाहन करणारी एक पोस्ट केली आहे. मात्र, या आवाहनावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार पलटवार केला असून, ठाकरे गटाचे जिल्हा युवा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी मल्हार पाटील यांना बोचरा सवाल विचारला आहे.
“तुमच्या घरावर कोणता झेंडा?”
मल्हार पाटील यांच्या पोस्टरबाजीचा समाचार घेताना ॲड. संजय भोरे म्हणाले, “सोमवार, ६ एप्रिल रोजी भाजपा परिवारातील सदस्यांना घरावर भाजपचा ध्वज लावण्याचे आवाहन तुम्ही केले हे खरे; पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरावर कोणता झेंडा लावणार? तुमच्या घरावर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा की भाजपचा झेंडा असणार? कदाचित ‘माझा परिवार’ म्हणजे ‘तिन्ही झेंड्यांचा परिवार’ असे तर नाही ना?” असा उपहासात्मक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
“राजीनामा आणि प्रवेशाचा इव्हेंट कुठे गेला?”
पुढे बोलताना ॲड. भोरे यांनी पाटील कुटुंबीयांच्या राजकीय वाटचालीवर निशाणा साधला. ते म्हणाले, “ज्यांना प्रत्येक गोष्टीचा ‘इव्हेंट’ करण्याची उपजत सवय आहे, कारण डॉ. पद्मसिंह पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा आणि अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाचा राजीनामा दिल्याचे कुठेही अदयाप प्रसिद्ध झालेले नाही., म्हणून हे सहज आठवले.
कार्यकर्त्यांची अवस्था: ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?’


नेत्यांच्या या सोयीस्कर पक्षबदलामुळे आणि गोंधळामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांची मात्र मोठी अडचण झाली आहे. यावर मार्मिक भाष्य करताना ॲड. भोरे म्हणाले की, “या ‘सत्ता परिवाराच्या’ राजकारणामुळे कार्यकर्त्यांसाठी आज फक्त एकच गाणे प्ले करावेसे वाटत आहे आणि ते म्हणजे… ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?’“
मल्हार पाटील यांच्या या आवाहनावर ॲड. संजय भोरे यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता राजकीय वर्तुळात ‘माझा परिवार की सत्ता परिवार?’ यावरून चांगलीच चर्चा रंगली आहे.





