बेंबळी : शेतातील बोरवेलचे तोंड उघडून पाणी का दिले, या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका ८२ वर्षीय वृद्धाला अमानुष मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथे घडला आहे. वाद सोडवण्यासाठी आलेल्या पुतण्याला मारहाण करत, वृद्धाला ग्रामपंचायतीसमोर उचलून आपटण्यात आले. याप्रकरणी चौघांविरोधात बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बळीराम सोपान कोळगे (वय ८२, रा. केशेगाव, ता. जि. धाराशिव) असे गंभीर जखमी झालेल्या वयोवृद्ध फिर्यादीचे नाव आहे. मंगळवारी (ता. ७ एप्रिल) सकाळी ५ ते १० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. बळीराम कोळगे हे शेतात असताना आरोपींनी ‘बोरचे तोंड मुद्दामहून काढून पाणी का दिले’ अशी कुरापत काढत त्यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली. यावेळी वाद पाहून भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या पुतण्यालाही आरोपींनी सोडले नाही, त्यालाही मारहाण केली.
शेतातील वादानंतर आरोपींनी फिर्यादीचा मुलगा आणि सून यांना ग्रामपंचायत कार्यालयाजवळ बोलावून घेतले. तेथे सर्वांसमक्ष पुन्हा शिवीगाळ करत ८२ वर्षीय बळीराम कोळगे यांना उचलून जमिनीवर आपटून फेकून दिले. वयोवृद्ध असल्याने या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहेत. इतक्यावरच न थांबता आरोपींनी त्यांच्या सुनेचा मोबाईल फोडून नुकसान केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
या गंभीर मारहाणीनंतर जखमी बळीराम कोळगे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी बुधवारी (ता. ८ एप्रिल) दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून बेंबळी पोलीस ठाण्यात श्रीराम गोपाळ (कोळगे), जयश्री श्रीराम कोळगे, बालाजी जगन्नाथ पवार आणि तानाजी जगन्नाथ पवार (सर्व रा. केशेगाव, ता. जि. धाराशिव) या चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११७(२), ११५(२), ३२४(४), ३५२, ३५१(२)(३) सह ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अमानुष मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.





