भूम : चारापाण्याची कोणतीही सोय न करता, अत्यंत क्रूरपणे कत्तलीसाठी चार जर्सी गायींची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका पिकअप वाहनावर भूम पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीच्या गोवंशीय जनावरांची सुटका केली असून, याप्रकरणी एकाविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. ८ एप्रिल) दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास भूम शहरातील शासकीय दूध डेअरीजवळील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. तानाजी भिकाजी सोनवणे (वय ३८, रा. भोनगिरी, ता. भूम, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
शासकीय दूध डेअरीजवळून जाणाऱ्या एका पिकअपची (क्र. एमएच २५ एजे १८३५) पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडी अडवून तपासणी केली. त्यावेळी वाहनामध्ये चार जर्सी गायी (गोवंशीय जनावरे) अत्यंत निर्दयीपणे कोंबून भरलेल्या अवस्थेत आढळून आल्या. आरोपीने या जनावरांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. कत्तलीच्या उद्देशाने ही बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीच्या या चारही गायी ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली.
याप्रकरणी भूम पोलिसांच्या वतीने सरकारच्या तर्फे देण्यात आलेल्या फिर्यादीवरून आरोपी तानाजी सोनवणे याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमाचे कलम ११(१)(ड) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(अ)(ब), ९(ए) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भूम पोलीस करत आहेत.




