धाराशिव: जिल्हयातील येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चोराखळी येथील ‘महाकाली कला केंद्रावर’ शनिवारी रात्री सशस्त्र टोळक्याने धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून झालेल्या या राड्यात नाचकाम करणाऱ्या महिलांना बेदम मारहाण करण्यात आली असून, सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी येरमाळा पोलिसांनी ७-८ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास येडशी येथील काही तरुण गाड्या घेऊन कला केंद्रावर आले. यावेळी किरकोळ कारणावरून वाद उफाळून आला. संतापलेल्या तरुणांनी हातात तलवारी, कोयते आणि लोखंडी रॉड घेऊन कला केंद्रात प्रवेश केला. त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या महिला कलाकारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका महिलेच्या गळ्याला कोयता लावून तिला जीवे मारण्याची धमकी देत घरातील कपाटात ठेवलेली २ लाख रुपयांची रोकड आणि सुमारे ३ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण मोठा ऐवज लुटून नेला.
कला केंद्राची केली दुरवस्था
केवळ लूटमार करूनच हे टोळके थांबले नाही, तर त्यांनी संपूर्ण कला केंद्राची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. यामध्ये:
-
कार्डिओ मशीन (रनिंग मशीन), टीव्ही, फ्रीज, एअर कंडिशन (AC) आणि कपाटांचे नुकसान केले.
-
केंद्रातील ७० प्लास्टिक खुर्च्या, पाण्याचे जार आणि खिडक्यांच्या काचा फोडून टाकल्या.
-
पार्किंगमध्ये उभी असलेली महिंद्रा XUV 500 (MH 14 DN 6809) ही गाडी देखील फोडून तिचे अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान केले आहे.
परस्परविरोधी आरोप
एककीडे कला केंद्र चालक महिलांनी मारहाण आणि लुटीचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे येडशी गावातील तरुणांचे म्हणणे आहे की, कला केंद्र चालकांनी गावातील एका तरुणाला विनाकारण मारहाण केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी गेले असता वाद वाढला आणि त्याचे रूपांतर या राड्यात झाले.
येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी फिर्यादी कशिश राजेश शेरकर ( वय २०, पार्टी मालकीण , रा. इंगळे गल्ली, धाराशिव ) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुनील शेळके, जयंत भोसले, नागेश लोखंडे, हनुमंत शेळके, योगेश चव्हाण, दिनेश चव्हाण, सोनु पवार आणि इतर अज्ञात ५ ते ७ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार खालील कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे:
-
कलम ३३३, ११९(१), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३२४(५), १९१(२) आणि १९१(३).
या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) तात्या रुपाजी भाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लक्ष्मण भोजगुडे करत आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कला केंद्रांवरील वादाचा विषय ऐरणीवर आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.






