बेंबळी : घरासमोरील रस्त्यावर चारचाकी आणि दुचाकी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कुटुंबाला काठी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बेंबळी (ता. जि. धाराशिव) येथे घडली. याप्रकरणी रविवारी (ता. १२) रात्री उशिरा बेंबळी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधाकर माणिक भोजणे (वय ४४, रा. बेंबळी) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास आरोपी लहु दाणे आणि गणेश खंडु दाणे (दोघे रा. बेंबळी) यांनी भोजणे यांच्या घरासमोरील रस्त्यावर आपली चारचाकी आणि मोटारसायकल लावली होती. याच कारणावरून आरोपींनी सुधाकर भोजणे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठीने बेदम मारहाण केली.
हा प्रकार पाहून सुधाकर यांची पत्नी आणि मुलगा त्यांना वाचवण्यासाठी व भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले. मात्र, संतापलेल्या आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नाही तर, ‘तुम्ही या गल्लीत कसे राहता तेच बघतो,’ अशी गंभीर धमकीही आरोपींनी या कुटुंबाला दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या मारहाणीनंतर सुधाकर भोजणे यांनी थेट बेंबळी पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी लहु दाणे आणि गणेश दाणे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) (३), आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.







