उस्मानाबादचे ‘धाराशिव’ झाले. शहराचे नामांतर मोठा गाजावाजा करत साजरे करण्यात आले. नावाच्या नव्या पाटीसोबत शहराचे नशीबही बदलेल आणि विकासाची नवी पहाट उजाडेल, अशी भाबडी आशा धाराशिवकरांना होती. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांच्या पदरी घोर निराशाच पडली आहे. “केवळ नाव बदलून समस्या सुटत नाहीत,” हा कटू अनुभव सध्या धाराशिवकर रोज घेत आहेत. जिल्हा मुख्यालय असूनही एखाद्या शहराने ‘मागास’ किती असावे, याचे हे उत्तम (किंवा दुर्दैवी) उदाहरण ठरत आहे.
रस्त्यांची ‘धुळधाण’ अन् नित्यनियमाची वाहतूक कोंडी
शहराचा मुख्य रस्ता असलेल्या बार्शी नाका ते शहर पोलीस ठाणे या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. एका बाजूच्या रस्त्याचे काम होऊन सहा महिने उलटले, तरी दुसऱ्या बाजूच्या रस्त्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. या रखडलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी हा आता धाराशिवकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. नवीन झालेल्या रस्त्यावर प्रवेश करणे म्हणजे वाहनचालकांसाठी एखाद्या स्टंटमनसारखी जीवघेणी कसरत ठरत आहे; आणि दुर्दैवाने हे आता सर्वांच्या अंगवळणी पडले आहे. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे दुतर्फा असलेल्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असून, त्यांचे व्यवसाय पार धुळीस मिळाले आहेत.
मुलांनी सुट्टीत काय पुढाऱ्यांचे फ्लेक्स बघायचे?
सध्या मुलांच्या परीक्षा सुरू असून, लवकरच त्यांना उन्हाळी सुट्ट्या लागतील. सुट्टीत मुलांना घरात बसून टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा सल्ला देणे सोपे आहे, पण मग त्यांनी करायचे तरी काय? हा खरा प्रश्न आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहरात मुलांच्या मनोरंजनासाठी ना एखादा जलतरण तलाव (स्विमिंग पूल) आहे, ना एखादा सुसज्ज बगीचा. मग, मुलांनी रस्त्याच्या दुतर्फा उडणारी धूळ खात, चौकाचौकात लागलेले पुढाऱ्यांचे मोठमोठे फ्लेक्स बघत फिरायचे का? असा संतप्त सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे.
नाव ‘वैद्यकीय महाविद्यालया’चे, पण रस्ता ‘सोलापूर’चा!
शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन आणि महागड्या वास्तू उभ्या राहत आहेत, पण सरकारी व्यवस्थेची मानसिकता मात्र अद्याप बदललेली नाही. शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले खरे; पण शासकीय जिल्हा रुग्णालयाची वर्षानुवर्षांची ओळख असलेली “सोलापूरला रेफर” करण्याची प्रथा अजूनही पुसली गेलेली नाही. गंभीर रुग्णांना आजही उपचारासाठी सोलापूरची वाट धरावी लागते, हे या व्यवस्थेचे मोठे अपयश आहे.
मूलभूत सुविधांची वानवा अन् मोकाट कुत्र्यांची दहशत
एकीकडे शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असला तरी, स्थानिक प्रशासनाला त्याचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन, शहराची नियमित स्वच्छता आणि शहर वाहतुकीसाठी ‘सिटीबस’ यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या नागरी सुविधांकडे प्रशासनाकडून पूर्णपणे डोळेझाक केली जात आहे. यातच भर म्हणून शहरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढला असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही.
प्रशासनाने आता भवितव्य रंगवावे!
थोडक्यात सांगायचे तर, धाराशिव शहराची सद्यस्थिती पाहिल्यावर कविवर्य सुरेश भट यांच्या, “हे असेच होते, ते ही तसेच होते, आपापल्या ठिकाणी सारे तसेच होते,” या ओळी अगदी चपखल लागू पडतात. नाव बदलून ऐतिहासिक वारसा नक्कीच जपला गेला; पण जोपर्यंत रस्ते, आरोग्य, पाणी आणि उद्यानांसारख्या मूलभूत प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही, तोपर्यंत धाराशिव खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ किंवा विकसित होणार नाही. प्रशासनाने केवळ पाटी रंगवण्यावर धन्यता न मानता, आता शहराचे भविष्य रंगवण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.
■ सवाल धाराशिवकरांचा…
धाराशिवच्या या दुरवस्थेला नक्की जबाबदार कोण? सुस्त प्रशासन, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव की आपलीच नागरिक म्हणून असलेली उदासीनता? यावर आता गांभीर्याने आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.






