धाराशिव | महाराष्ट्रभर गाजलेल्या आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या कै. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर १४ मे रोजी जाहीर होणार आहे. तब्बल २० वर्षे चाललेली प्रदीर्घ कायदेशीर लढाई, साक्षी-पुराव्यांची तपासणी आणि अंतिम युक्तिवाद आता पूर्ण झाला असून, या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात या प्रकरणाचा ऐतिहासिक फैसला सुनावला जाणार आहे.
१६ महिन्यांचा कट आणि परदेशी शस्त्रांचा वापर


पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यासाठी तब्बल १६ महिने कट रचला गेल्याचे तपासात उघड झाले होते. फेब्रुवारी २००५ मध्ये लातूर येथे पहिली रेकी करण्यात आली होती, मात्र तो प्रयत्न फसला. अखेर ३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे ही निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी अतिशय क्रूरपणे पवनराजे यांच्यावर गोळ्या झाडल्या, ज्यातील एक त्यांच्या डोक्यात लागली. कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून त्यांचे चालक समद काझी यांच्यावरही गोळी झाडण्यात आली.
पवनराजे यांच्याकडे स्वतःचे परवानाधारक रिव्हॉल्व्हर होते, मात्र त्यांना ते काढण्याची संधीच मिळाली नाही. या हत्येत ‘मेड इन युएसए’ आणि ‘चायना’ बनावटीची परदेशी शस्त्रे वापरण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
३ तपास यंत्रणा आणि १२८ साक्षीदार
या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस, त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) आणि शेवटी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला होता. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी निंबाळकर यांनी कोर्टात धाव घेतल्यानंतर सीबीआयने तपासाची चक्रे फिरवली. या प्रदीर्घ खटल्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह तब्बल १२८ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत.
२५ लाखांची सुपारी आणि ९ आरोपी
सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, राजकीय कारकीर्द आणि अस्तित्वाला निर्माण झालेल्या धोक्यामुळे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे आणि मोहन शुक्ला यांनी २५ लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली. या प्रकरणात खालील ९ जणांवर आरोपी म्हणून खटला चालवण्यात आला:
१. डॉ. पद्मसिंह पाटील (माजी गृहमंत्री)
२. पारसमल जैन बादला
३. दिनेश तिवारी (शूटर)
४. मोहन शुक्ला (नगरसेवक, मुंबई)
५. सतीश मंदाडे (लातूर)
६. पिंटू सिंग उर्फ महात्मा चौधरी (शूटर)
७. कैलास यादव (बसपा नेता, युपी)
८. शशिकांत कुलकर्णी (माजी उत्पादन शुल्क निरीक्षक)
९. छोटे पांडे
न्यायालयाचा कडक पवित्रा: गैरहजर आरोपींना वॉरंट
आज (२० एप्रिल) सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या सुनावणीत डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह आरोपी क्रमांक १ ते ५ आणि ९ न्यायालयात हजर होते. मात्र, आरोपी क्रमांक ७ कैलास यादव आणि आरोपी क्रमांक ८ शशिकांत कुलकर्णी हे न्यायालयात गैरहजर होते. त्यांच्या वकिलांनी न्यायालयात हजेरीतून सूट देणारा अर्ज (Exemption Application) दाखल केला होता.
मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत कडक शब्दांत सुनावले की, “हा खटला आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून सर्व आरोपींची न्यायालयात उपस्थिती अनिवार्य आहे.” या आधारावर न्यायालयाने दोन्ही गैरहजर आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) काढले असून त्यांना १४ मे रोजी निकालाच्या दिवशी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
शूटर पिंटू सिंगला प्रत्यक्ष हजर करण्याचे आदेश
या प्रकरणातील मुख्य शूटर आरोपी क्रमांक ६ पिंटू सिंग ऊर्फ महात्मा चौधरी याला बिहारच्या सिवान कारागृहातून आज हजर करण्यात आले होते. १४ मे रोजी निकालाच्या दिवशी त्याला न्यायालयात प्रत्यक्ष हजर (Produce Physically) करण्याचे अधिकृत पत्र सिवान कारागृहाच्या अधीक्षकांना पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि अंतिम निकालाची उत्सुकता
या खटल्यादरम्यान बचाव पक्षाकडून एकूण १,२५० पानांचे लेखी म्हणणे कोर्टासमोर मांडण्यात आले. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वतीने पवनराजे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यावर अनेक आरोप करत हे प्रकरण राजकीय द्वेषातून गोवल्याचा दावा करण्यात आला होता.
न्यायालयाने यापूर्वीच सर्व आरोपींना सुनावणी आणि निकालाच्या दिवशी हजर राहण्याचे कडक निर्देश दिले आहेत. आता सीबीआयने मांडलेले भक्कम पुरावे, प्रत्यक्षदर्शींची साक्ष आणि तब्बल २० वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा पाहता न्यायदेवता १४ मे रोजी काय निकाल देते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.





