धाराशिव : ‘तुझा मुलगा आमच्या देवाच्या कार्यक्रमात जेवला, त्यामुळे आमच्यावर देव कोपला आणि माझ्या मुलाचा अपघात झाला,’ असा अंधश्रद्धेतून आरोप करत एका महिलेला आणि तिच्या मुलाला जात पंचायतीसमोर उभे केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये समोर आला आहे. जात पंचायतीने या महिलेला चपलेने मारहाण करत तब्बल दोन लाख पंचावन्न हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच, जिवे मारण्याची धमकी देऊन ६० हजार रुपये बळजबरीने उकळले आहेत. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात सोमवारी (ता. २०) चौघांविरुद्ध सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक (जात पंचायत) कायदा आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गायत्री शाम चव्हाण (वय ३५, रा. जुना बस डेपो, दूध डेअरी पाठीमागे, धाराशिव, हल्ली मुक्काम- पंचनगर, घाटकोपर, मुंबई) यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमका प्रकार काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायत्री चव्हाण आणि आरोपी हे एकाच वस्तीत राहणारे असून सध्या ते मुंबईत वास्तव्यास आहेत. दि. ६ एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आरोपी सागरबाई जगू पवार, ज्योती ज्योतीराम पवार, ज्योतीराम जगू पवार आणि प्रियांका गणेश पवार यांनी गायत्री चव्हाण यांच्याशी वाद घातला. “तुझा मुलगा आमच्या देवाच्या कार्यक्रमात जेवला म्हणून आमच्यावर देव कोपला आहे. त्यामुळेच माझ्या मुलाचा अपघात झाला,” असा अजब आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा आरोप आरोपींनी केला.
जात पंचायत बसवून चपलेने मारहाण
या आरोपानंतर आरोपींनी गायत्री चव्हाण आणि त्यांच्या मुलाला बळजबरीने लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा येथे नेले. त्याठिकाणी आरोपींनी ‘जात पंचायत’ बसवली. या पंचायतीमध्ये मायलेकरांना शिवीगाळ करण्यात आली, तसेच भर पंचायतीत चपलेने अमानुष मारहाण करण्यात आली.
जिवे मारण्याची धमकी आणि खंडणी
या तथाकथित जात पंचायतीने फिर्यादी व त्यांच्या मुलाला या घटनेसाठी ‘दोषी’ धरून तब्बल २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. “आत्ताच्या आत्ता ६० हजार रुपये द्यावे लागतील, नाहीतर उचलून नेऊन जिवे मारून टाकीन,” अशी गंभीर धमकी आरोपींनी दिली आणि गायत्री चव्हाण यांच्याकडून ६० हजार रुपये बळजबरीने उकळले.
या अमानुष प्रकाराने घाबरलेल्या गायत्री चव्हाण यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) सह जात पंचायत (सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक) अधिनियम कलम ३, ४, ५ आणि ६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, एकविसाव्या शतकातही जात पंचायतीसारख्या अघोरी प्रथा सुरूच असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







