धाराशिव – बार्शी ते बोरफळ या रस्त्याचे काम अत्यंत कासवगतीने सुरू असून, या रखडलेल्या कामामुळे आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आणखी एका निष्पाप युवकाचा बळी गेला आहे. काल सांजा गावाजवळ रस्त्यावरील खड्ड्यात पडून भंडारवाडी येथील ओम दिलीप अंधारे ( वय २३ ) नामक युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शहर आणि परिसरातून प्रशासनाच्या कारभारावर व संबंधित गुत्तेदारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
खड्ड्यांचा दुसरा बळी आणि प्रशासनाची डोळेझाक
बार्शी-बोरफळ रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतलेला हा दुसरा बळी आहे. यापूर्वी, सुमारे दीड वर्षाआधी धाराशिव शहरातील ‘जाधवर’ या युवकाचा याच रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. आता पुन्हा तशीच घटना घडल्याने संतप्त नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत:
-
प्रशासन अजून किती काळ या ‘लाडक्या गुत्तेदाराचे’ लाड पुरवणार?
-
हा लाडका गुत्तेदार अजून किती निष्पाप जणांचे बळी घेणार?
-
प्रशासन या लाडक्या गुत्तेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का?
गुत्तेदाराचा ‘उचित सत्कार’ करा: सोमनाथ गुरव
या गंभीर घटनेवर धाराशिव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाने आतापर्यंत दोन निष्पाप युवकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी या लाडक्या गुत्तेदाराचा आपापल्या परीने ‘उचित सत्कार’ करावा,” अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली आहे.
भाजप नेत्याच्या ‘रील’बाजीवर सडकून टीका
केवळ गुत्तेदारच नाही, तर गुरव यांनी एका स्थानिक भाजप नेत्यावरही सडकून टीका केली आहे. “आता बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाबाबत पुन्हा अजून एक मीटिंग होणार, काम तात्काळ चालू करण्याचे आदेश दिले जाणार, त्यानंतर ड्रोनने शूटिंग होणार आणि नागरिकांना पुन्हा एकदा फक्त रील बघायला मिळणार,” असा सणसणीत टोला त्यांनी ‘स्वयंघोषित रस्ते व रेल्वे मंत्र्यांना’ लगावला आहे.
या घटनेमुळे धाराशिवकरांमध्ये संतापाची लाट असून, प्रशासनाने आतातरी या रस्त्याचे काम गांभीर्याने घेऊन दर्जेदार व जलदगतीने पूर्ण करावे आणि दोषी गुत्तेदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.





