भूम : तालुक्यातील साडेसांगवी येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या पाणीपुरवठ्याच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून ग्रामसेवकाला शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. ‘तू गावाला पाणी कसे देतो, तेच बघतो,’ अशी धमकी देत विहिरीवरील शासकीय मोटार चालू न करू दिल्याने याप्रकरणी चौघांवर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष किसन शेंबडे, कैलास किसन शेंबडे, योगेश चंद्रकांत शेंबडे आणि बालाजी भास्कर देवकते (सर्व रा. साडेसांगवी, ता. भूम) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, साडेसांगवी येथील ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) शशिकांत गजेंद्र पवार (वय ४२, रा. रामकृष्ण कॉलनी, धाराशिव) हे दि. ४ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत बाणगंगा नदीपात्रातील विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे आलेल्या उपरोक्त चारही आरोपींनी त्यांना विहिरीवरील शासकीय मोटार चालू करू दिली नाही. तसेच, जलजीवन योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या पाईपलाईनपैकी ९० मीटरचे काम अडवून ठेवले.
‘शासकीय पाईपलाईनचे काम का अडवून ठेवले आहे आणि गावाला पाणी का सोडू देत नाही?’ अशी विचारणा ग्रामसेवक पवार यांनी केली असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘तू कसे काम करतो आणि गावाला पाणी कसे देतो, तेच बघतो’ अशी थेट धमकी देऊन त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी शशिकांत पवार यांनी बुधवारी (दि. ६ मे) भूम पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या प्रथम खबरेवरून शासकीय कामात अडथळा आणि दमदाटी केल्याप्रकरणी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, २९२, १२६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भूम पोलीस करत आहेत.







