कळंब : ‘तुझ्या सासूकडून वीस लाख रुपये मागवून घे’ असे म्हणत एका ३७ वर्षीय तरुणाचे भरदिवसा साठे चौक भागातून अपहरण करण्यात आले. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याला स्कॉर्पिओतून ढोकी येथे नेऊन चाकू आणि गाडीच्या टॉमीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भीषण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुड्ड्या ऊर्फ प्रकाश शहाजी काळे, आबा आप्पा शिंदे (दोघे रा. मोहा) आणि सुनील उजना चव्हाण (रा. ढोकी, ता. जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संतोष बब्रुवान काळे (वय ३७, रा. साठे चौक, जुनी दूध डेअरीजवळ, कळंब) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १० मे) दुपारी दोन वाजेच्या सुमारास फिर्यादी संतोष काळे हे साठे चौकातील जुन्या दूध डेअरीजवळ होते. यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी त्यांना बळजबरीने एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत बसवले. त्यानंतर आरोपींनी त्यांना थेट ढोकी येथील सुनील चव्हाण याच्या शेड फार्मवर नेले. तिथे गेल्यानंतर आरोपींनी संतोष यांच्याकडे पैशांचा तगादा लावला व ‘तुझ्या सासूकडून वीस लाख रुपये मागवून घे,’ अशी मागणी केली. मात्र, संतोष यांनी पैसे मागण्यास स्पष्ट नकार दिला.
चाकूने केले वार अन् जिवे मारण्याची धमकी
संतोष यांनी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून तिन्ही आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी गाडीची टॉमी आणि चाकूने वार करून संतोष यांना जखमी केले. ‘तू जर पैसे दिले नाहीत, तर तुला जिवे मारून टाकू,’ अशी गंभीर धमकीही आरोपींनी दिली.
या थरारक घटनेनंतर सुटका झालेल्या संतोष काळे यांनी सोमवारी (ता. ११ मे) कळंब पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी गुड्ड्या काळे, आबा शिंदे आणि सुनील चव्हाण या तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३) आणि ३(५) अन्वये अपहरण, खंडणी व मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. भरदिवसा घडलेल्या या अपहरण आणि मारहाणीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, कळंब पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.





