सण-उत्सव, सुख-दुःखाचे प्रसंग किंवा रोजच्या आहारातील गोडवा वाढवणारा ‘खवा’ आज सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी कर्दनकाळ ठरू लागला आहे, ही अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक वस्तुस्थिती नुकत्याच उघडकीस आलेल्या एका कारवाईवरून समोर आली आहे. येरमाळ्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल २९५ किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला. परंतु, हा आकडा म्हणजे हिमनगाचे केवळ एक टोक आहे. बाजारात दररोज तब्बल ३ ते ४ हजार किलो भेसळयुक्त खव्याची सर्रास विक्री होत आहे, ही माहिती सामान्य ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकवणारी आहे. ज्या अन्नाला आपण पूर्णब्रह्म मानतो, तिथे केवळ पैशांच्या हव्यासापोटी चाललेला हा ‘जिवाशी खेळ’ आता सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे.
भेसळीचे जाळे आणि आरोग्याचा बळी
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली आणि कर्नाटकातील जमखंडीवरून हा बनावट खवा मराठवाड्यात, विशेषतः येरमाळा आणि आसपासच्या भागात पुरवला जात आहे. अवघ्या १६० ते १८० रुपये किलो दराने मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या रासायनिक पावडरचा (Chemicals) वापर करून अवघ्या ७० रुपयांत हा खवा तयार केला जातो. हाच विषारी खवा पुढे ग्राहकांच्या पदरात शुद्ध खव्याच्या नावाखाली चढ्या दराने मारला जातो.
हा निव्वळ व्यापार नाही, तर हा थेट जनतेच्या आरोग्यावर केलेला सामूहिक हल्ला आहे. रासायनिक द्रव्ये आणि निकृष्ट दूध पावडरपासून बनवलेला हा खवा खाऊन लहान मुले, वृद्ध आणि सामान्य नागरिकांच्या आरोग्याचे काय हाल होत असतील, याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे. पोटाचे गंभीर आजार, विषबाधा आणि दीर्घकालीन आजारांना आमंत्रण देणारा हा व्यवसाय म्हणजे छुप्या पद्धतीने चाललेली गुन्हेगारीच आहे.
प्रशासकीय कारवाईची ‘मलमपट्टी’ पुरेशी नाही
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, प्रश्न असा पडतो की, हा भेसळीचा अड्डा एवढी वर्षे बिनदिक्कतपणे कसा चालत होता? दररोज ३ ते ४ हजार किलो भेसळयुक्त खवा बाजारात येतो, तो यंत्रणेच्या डोळ्यांदेखत कसा विकला जाऊ शकतो?
केवळ सण-उत्सवांच्या काळात किंवा एखाद्या विशिष्ट मोहिमेअंतर्गत छापे टाकून आणि काही हजारांचा माल जप्त करून हा प्रश्न सुटणारा नाही. ही तात्पुरती मलमपट्टी झाली. खवा माफियांमध्ये कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही, हेच यावरून स्पष्ट होते. जोपर्यंत या रॅकेटच्या मुळाशी जाऊन, उत्पादन करणाऱ्यांपासून ते छुप्या पद्धतीने वाहतूक करणाऱ्या आणि तो विकणाऱ्या प्रत्येक कडीला कठोर बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोपर्यंत ही कीड संपणार नाही.
आता गरज आहे ‘कठोर’ प्रहाराची!
“अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही, तर अशा नराधमांना अजामीनपात्र गुन्हा ठरवून जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा झाली पाहिजे.”
पैशांच्या हव्यासापोटी निष्पाप लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या खवा माफियांना कायद्याचा असा वचक बसला पाहिजे की, पुन्हा असा गुन्हा करण्याची कोणाची हिंमत होता कामा नये. केवळ दंडात्मक कारवाई करून हे लोक सुटले, तर ते पुन्हा नव्या नावाने हाच काळा धंदा सुरू करतील.
तसेच, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी भेसळीबाबत तक्रार करावी. परंतु, प्रशासनाने स्वतःची गुप्तहेर यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी नागरिक पुढे येतीलच असे नाही; यंत्रणेने स्वतःहून अशा अड्ड्यांचा शोध घेऊन ते मुळासकट उपटून टाकले पाहिजेत.
ग्राहकांनो, आता तरी जागे व्हा!
या संपूर्ण प्रकरणात ग्राहकांनीही आता अत्यंत जागरूक राहण्याची वेळ आली आहे. स्वस्त मिळते म्हणून किंवा केवळ आकर्षक पॅकिंगला भुलून खाद्यपदार्थ खरेदी करणे थांबवले पाहिजे. आपण काय खातोय आणि आपल्या मुलांना काय भरवतोय, याबद्दल सजगता दाखवणे ही काळाची गरज आहे.
शेवटी, येरमाळ्यातील हा प्रकार म्हणजे संपूर्ण राज्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. आज खवा आहे, उद्या दुसरं काही असेल. अन्नपदार्थांमधील भेसळ हा मानवी हक्कांचे उल्लंघन करणारा गंभीर गुन्हा आहे. सरकारने आणि प्रशासनाने आता कोणतीही दयामाया न दाखवता, या ‘गोड’ विषाचा पुरवठा करणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, हीच संपूर्ण महाराष्ट्राची तीव्र भावना आहे.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह




