आपण रोजच्या जीवनात कितीतरी माणसांना भेटतो.
काही ओळखीची असतात.
काही अनोळखी.
काही आपली वाटतात.
काही परकी.
पण पंढरीच्या वारीत एकदा पाऊल ठेवले की ‘ओळखीचा’ आणि ‘अनोळखी’ यांच्यातील ही सीमारेषाच हळूहळू पुसली जाते.
कारण वारीत तुमचे नाव विचारण्याआधी तुम्हाला एक हाक ऐकू येते—
‘माऊली!’
केवढा सुंदर शब्द!
ना नावाची गरज…
ना आडनावाची…
ना पदाची…
ना जातीची…
ना ओळखीची…
तुम्ही कोण आहात, कुठून आलात, किती श्रीमंत आहात, कोणत्या पदावर आहात—यापैकी कशालाही वारीत फारसा अर्थ उरत नाही.
तुम्ही वारीत आलात…
म्हणजे तुम्ही ‘माऊली’ झालात!
अहंकार गळून पडतो…
माणूस आयुष्यभर स्वतःभोवती अनेक ओळखी घेऊन फिरत असतो.
मी अधिकारी…
मी श्रीमंत…
मी प्रतिष्ठित…
मी अमुक जातीचा…
मी तमुक पक्षाचा…
माझे पद…
माझा पैसा…
माझी प्रतिष्ठा…
पण वारीच्या वाटेवर या सगळ्या ओळखी हळूहळू मागे पडतात.
राजा असो वा रंक, श्रीमंत असो वा गरीब, अधिकारी असो वा शेतमजूर—प्रत्येकाच्या मुखी एकच नाम असते आणि प्रत्येकाच्या पायांना एकच दिशा असते.
पंढरपूर!
इथे कुणी कुणाला ‘साहेब’ म्हणत नाही.
कुणी कुणाला त्याच्या पदाने हाक मारत नाही.
एकच हाक—
‘माऊली!’
आईच्या मायेचा अर्थ सामावलेला हा शब्द वारकऱ्यांच्या ओठांवर आला की समोरचा माणूस परका राहतच नाही.
अनोळखीपणाचा अंत…
वारीत तुमच्या शेजारी चालणारा माणूस कालपर्यंत पूर्णपणे अनोळखी असतो.
त्याचे नाव माहीत नसते.
गाव माहीत नसते.
घरची परिस्थिती माहीत नसते.
पण काही किलोमीटर एकत्र चालल्यानंतर तो आपला होतो.
‘माऊली, पाणी घ्या…’
‘माऊली, थकलात का?’
‘माऊली, थोडं बसा…’
‘माऊली, प्रसाद घ्या…’
या चार शब्दांत नाती निर्माण होतात.
रक्ताचे नाते नसते.
व्यवहाराचे नाते नसते.
स्वार्थाचे नाते नसते.
तरी माणूस माणसाशी जोडला जातो.
कारण दोघांचे ध्येय एकच असते—
विठू माऊलीचे दर्शन!
जातीभेद आणि वर्गभेदाला मूठमाती…
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, संत सावता माळी अशा संतपरंपरेने महाराष्ट्राला समतेचा विचार दिला.
तो विचार केवळ पुस्तकात नाही.
तो वारीत चालताना दिसतो.
एकाच पंगतीत हजारो वारकरी बसतात.
एकाच हातातून प्रसाद घेतात.
एकमेकांचे पाय चेपतात.
एकमेकांना आधार देतात.
भजनात एकत्र गातात.
फुगडीत एकत्र नाचतात.
तिथे कुणाच्या कपाळावर त्याची जात लिहिलेली नसते.
कुणाच्या कपड्यांवर त्याची आर्थिक परिस्थिती मोजली जात नाही.
एकच ओळख असते—
वारकरी!
आणि एकच नाते—
माऊली!
स्त्री असो वा पुरुष… प्रत्येक जण माऊली!
‘माऊली’ या शब्दाची आणखी एक सुंदर बाजू आहे.
वारीत स्त्री असो किंवा पुरुष—एकमेकांना आदराने ‘माऊली’ म्हणून संबोधले जाते.
समोरच्या व्यक्तीकडे केवळ स्त्री किंवा पुरुष म्हणून न पाहता मायेचे, आदराचे आणि पवित्र नाते म्हणून पाहण्याचा हा संस्कार आहे.
लाखोंच्या गर्दीतही ही हाक आपलेपणाची भावना निर्माण करते.
‘माऊली!’
या एका शब्दात आदर आहे.
माया आहे.
आपलेपणा आहे.
आणि एक अदृश्य सुरक्षिततेची भावनाही आहे.
आजच्या समाजाला कदाचित याच दृष्टीची सर्वाधिक गरज आहे.
रिंगणात वय विसरते…
वारीतील रिंगण सोहळा म्हणजे भक्तीचा अद्भुत आविष्कार.
अश्व धावतो…
धुळीचे लोट उठतात…
‘माऊली… माऊली…’चा जयघोष आकाशाला भिडतो.
आणि त्या वातावरणात वयाचे बंधनही गळून पडते.
कुठे फुगडी सुरू होते.
कुठे झिम्मा रंगतो.
कुठे वारकरी अभंगाच्या तालावर नाचू लागतात.
कालपर्यंत एकमेकांना न ओळखणारे लोक हातात हात घेऊन आनंद साजरा करतात.
त्या क्षणी कोण वृद्ध?
कोण तरुण?
कोण श्रीमंत?
कोण गरीब?
काहीच महत्त्वाचे राहत नाही.
उरतो फक्त आनंद.
आणि त्या आनंदाच्या केंद्रस्थानी असतो—
पांडुरंग!
चालता चालता मनही हलके होते…
वारी फक्त शरीराचा प्रवास नाही.
ती मनाचाही प्रवास आहे.
कित्येक किलोमीटर चालताना शेजारी चालणाऱ्या अनोळखी ‘माऊली’शी संवाद सुरू होतो.
घरातील गोष्टी निघतात.
सुखाच्या आठवणी निघतात.
दुःखाच्या जखमा उघडतात.
कधी डोळे पाणावतात.
कधी दोघेही हसतात.
कालपर्यंत जो माणूस अनोळखी होता, त्याच्याजवळ आज मन मोकळे होते.
तो तुमची समस्या सोडवू शकेलच असे नाही.
पण तो ऐकतो.
समजून घेतो.
खांद्यावर हात ठेवतो.
आणि म्हणतो—
‘काळजी करू नका माऊली… पांडुरंग आहे!’
कदाचित त्या एका वाक्याने मनावरचे कितीतरी ओझे हलके होते.
आजच्या जगाला वारीची गरज आहे…
आज आपल्याकडे संवादाची असंख्य साधने आहेत.
मोबाइल आहे.
सोशल मीडिया आहे.
एका क्षणात जगाच्या दुसऱ्या टोकावरील माणसाशी बोलता येते.
पण तरीही माणूस एकटा होत चालला आहे.
शेजारी कोण राहतो, हे माहीत नाही.
समोरच्याचे दुःख ऐकायला वेळ नाही.
जात, धर्म, पैसा, पद, राजकारण यावरून माणसामाणसांत भिंती उभ्या राहत आहेत.
अशा काळात वारी एक वेगळीच दुनिया दाखवते.
इथे अनोळखी माणूस पाणी देतो.
अनोळखी माणूस पाय दाबतो.
अनोळखी माणूस दुःख ऐकतो.
अनोळखी माणूस आधार देतो.
आणि विशेष म्हणजे…
तो तुम्हाला ‘अनोळखी’ समजतच नाही.
तो तुम्हाला म्हणतो—
‘माऊली!’
कदाचित म्हणूनच वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही.
ती माणसाला माणूसपण शिकवणारी एक मोठी शाळा आहे.
वारी आपल्याला सांगते—
माणसाचे नाव विसरलात तरी चालेल.
त्याचे पद माहीत नसले तरी चालेल.
त्याची जात विचारली नाही तरी चालेल.
त्याच्याकडे किती पैसा आहे, हे माहीत नसले तरी चालेल.
फक्त…
त्याच्यातील माणूस ओळखता आला पाहिजे.
आणि त्या माणसाला प्रेमाने एकदा हाक मारता आली पाहिजे—
‘माऊली!’
वारी संपेल.
पालख्या पंढरपूरला पोहोचतील.
विठ्ठलाचे दर्शन होईल.
आषाढीचा सोहळा संपेल.
वारकरी आपापल्या घरी परततील.
पुन्हा शेती सुरू होईल.
पुन्हा कामधंदा सुरू होईल.
पुन्हा रोजचे जीवन सुरू होईल.
पण…
वारीत मिळालेली ‘माऊली’ ही हाक आणि त्या हाकेतली मायेची भावना आयुष्यभर मनाच्या गाभाऱ्यात जशीच्या तशी राहते.
म्हणूनच कदाचित…
वारीत कुणीच अनोळखी नसतो…
प्रत्येक जण ‘माऊली’ असतो!
— सुनील मधुकर ढेपे






