तुळजापूर: श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये सुरक्षा आणि हाऊसकीपिंगचे काम पाहणाऱ्या खासगी कंपन्यांच्या मनमानी कारभारावर आणि गैरव्यवहारावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या संदर्भात तुळजापूर येथील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना थेट पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे, तसेच कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
कर्मचाऱ्यांच्या संख्येवर प्रश्नचिन्ह
जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मंदिर संस्थानमध्ये गेल्या १० ते १५ वर्षांपासून सुरक्षा आणि हाऊसकीपिंग व्यवस्थेसाठी ‘BVG’ आणि ‘SISPL’ या खासगी कंपन्यांमार्फत सेवा पुरवली जात आहे. मात्र, या कंपन्यांचे नेमके किती कर्मचारी मंदिरात प्रत्यक्षात कार्यरत आहेत, यावर कोणाचेही नियंत्रण नाही.
पत्रात विचारण्यात आले आहे की, जर मंदिर प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाते, तर त्यांची हजेरी बायोमॅट्रिक पद्धतीने का घेतली जात नाही? सिक्युरिटी कंपनी आणि मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यांची सत्यप्रत देण्याची मागणीही लोकप्रतिनिधींनी केली आहे.
व्ही.आय.पी. गेटमधून नियमबाह्य दर्शन
सिक्युरिटी कंपन्यांचे काही कर्मचारी आणि ‘बोगस’ पुजारी यांच्या संगनमताने मंदिरात मोठा गैरप्रकार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप या पत्रात करण्यात आला आहे. भाविकांना थेट व्ही.आय.पी. गेटमधून नियमबाह्य पद्धतीने मंदिरात घुसवून दर्शन दिले जात आहे. यासाठी भाविकांकडून आर्थिक गैरव्यवहार केला जात असून याचे व्हीडिओ क्लिप्स आणि फुटेज उपलब्ध असल्याचा दावाही पत्रात करण्यात आला आहे.
या गैरप्रकारांमुळे रांगेत तासनतास उभे राहणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अशा कृत्यांमुळे श्री तुळजाभवानी देवस्थानची मोठी बदनामी होत असल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.
तुळजाभवानी मंदिरात भाविकांना महाद्वारातून दर्शनासाठी सोडावे
श्री क्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर प्रशासनाने महत्त्वाचे बदल करावेत, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी केली आहे. मंदिर संस्थानने काही दिवसांपासून भाविकांना महाद्वारातून दर्शनासाठी सोडण्यास प्रतिबंध केल्यामुळे भाविक, व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, तुळजापूर येथील नगरसेवकांनी अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यवाही अधिकारी यांना पत्र लिहून महाद्वारातून दर्शन रांग पूर्ववत सुरू करण्याची आग्रही मागणी केली आहे.
दर्शन व्यवस्थेतील वारंवार बदलांमुळे भाविक त्रस्त
जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनात लोकप्रतिनिधींनी म्हटले आहे की, मंदिर संस्थानकडून दर्शन व्यवस्थेमध्ये वरचेवर बदल केले जात आहेत. अधिक महिन्यांसारख्या गर्दीच्या काळात मंदिर संस्थानने व्ही.आय.पी. (VIP) दर्शन, ५०० रुपये आणि २०० रुपयांचे सशुल्क पास असणाऱ्या भाविकांना महाद्वारातून सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सर्वसामान्य भाविकांना दक्षिण पार्किंगवरून काळभैरवनाथाच्या मंदिरापासून दर्शनासाठी सोडण्यात येत आहे.
लांबच्या अंतरामुळे भाविकांची परवड, व्यापाऱ्यांनाही फटका
दक्षिण पार्किंग ते काळभैरवनाथ मंदिर हे अंतर चालण्यासाठी खूप लांब असल्याने सर्वसामान्य भाविकांचे, विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांचे हाल होत आहेत. तसेच, या नवीन व्यवस्थेमुळे मंदिराच्या मुख्य परिसरातील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे.
इतर वेळी महाद्वारातूनच दर्शन रांग सोडण्याची विनंती
पत्रात नमूद केल्यानुसार, शारदीय नवरात्र, चैत्री पौर्णिमा आणि शाकंभरी नवरात्र यांसारख्या अत्यंत गर्दीच्या मुख्य उत्सवांच्या वेळी कलोळ तीर्थ, कदम पाटील वाडा आणि दर्शन मंडपातून दर्शन रांग सोडण्याची व्यवस्था योग्य आहे. परंतु, हा गर्दीचा काळ सोडून इतर सामान्य दिवसांत भाविकांना थेट महाद्वारातूनच दर्शनासाठी सोडण्यात यावे, जेणेकरून भाविकांना सुलभ दर्शन होईल.
या निवेदनावर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, गटनेते अमोल कुतवळ, नगरसेवक रणजित इंगळे, अक्षय परमेश्वर , आनंद जगताप, प्रगती लोंढे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.






