धाराशिव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना हा निर्णय दुर्देवी असल्याचे म्हटले आहे.
कैलास पाटील यांनी सांगितले की, “खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा घेतलेला निर्णय दुर्देवी आहे. मात्र, पक्षाशी निष्ठा ठेवणारे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी बांधिलकी जपणारे कार्यकर्ते आजही मोठ्या संख्येने पक्षासोबत आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “धाराशिव जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करण्यात येईल.”
ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू असताना ठाकरे गटाने मात्र संघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे कैलास पाटील यांनी स्पष्ट केले आहे.





