धाराशिवच्या राजकीय आखाड्यात रोज नवनवीन ‘ट्विस्ट’ येत आहेत. आतापर्यंतच्या भागात आपण पाहिलं की ‘फेसबुक पिंट्या उर्फ पावशेरसिंह’ आणि त्यांचा भावी खासदार ‘मल्लू नेरूळकर’ कसे हवेत तीर मारत होते. पण आता या राजकारणाच्या सारीपाटावर ‘नागपूरकर सरदारांची’ अशी काही भन्नाट एन्ट्री झालीये, की फेसबुक पिंट्याच्या खोट्या प्रतिष्ठेचा फुगा पार फुटून गेला आहे!
चला तर मग, पाहूया धाराशिवच्या या नव्या राजकीय नाटकात कुणाचा गेम कसा पलटला…
मातोश्रीचा संताप आणि पाकीटमार पत्रकारांची ‘दिवाळी’
‘दबंग वाघ’ सूर्यराजेंनी तब्बल १२ वर्षांचा राजकीय वनवास भोगल्यानंतर, निष्ठेची जुनी मशाल विझवून थेट ‘ठाणेकर दाढीवाले’ साहेबांच्या सत्तेच्या गुहेत प्रवेश केला. यामुळे साहजिकच ‘मातोश्री’ निवासी बुधोजीराव यांचा चांगलाच संताप झाला. त्यांनी थेट धाराशिव गाठून सूर्यराजेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्यासोबत आलेल्या ‘प्रवक्त्यांनी’ तर सूर्यराजेंवर आरोपांची अक्षरशः तोफच डागली!
इकडे सूर्यराजेंवर खोटे आरोप होत आहेत हे बघून फेसबुक पिंट्या आणि ‘भावी खासदार’ मल्लू नेरूळकरला स्वर्गाला हात टेकल्यासारखा आनंद झाला. मल्लूने लगेच संधी साधली आणि आपल्या ‘पाकीटमार दांडकेबहाद्दर’ पत्रकारांना बोलावून पाकिटांचं वाटप केलं. “हे खोटे आरोप खरे आहेत असं भासवा आणि सगळीकडे व्हायरल करा!” असा आदेश सुटला. पाकीटमार पत्रकारांनीही इमानेइतबारे बातम्या चालवल्या आणि पिंट्या-मल्लूची टोळी खुशीत नाचू लागली.
पण त्यांना काय माहिती, की खरी ‘गेम’ तर पुढेच पलटणार आहे!
सूर्यराजेंचा ‘मास्टरस्ट्रोक’ आणि नागपूरकर सरदारांचा ‘हास्यविनोद’
फेसबुक पिंट्या आणि त्यांची पिलावळ जेव्हा आनंद साजरी करत होती, तेव्हा तिकडे सूर्यराजेंनी आपला ‘गेम’ थेट पलटवला.
आजपर्यंत फेसबुक पिंट्या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात अशी हवा करत होते की, ज्यांच्या हातात महाराष्ट्राची पूर्ण ‘जहागिरी’ आहे, ते ‘नागपूरकर सरदार’ आपले अत्यंत जवळचे आहेत. पण या खोट्या हवेतील हवा नागपूरकर सरदारांनीच काढून घेतली.
झालं असं की, सूर्यराजेंनी थेट नागपूरकर सरदारांची भेट घेतली. विशेष म्हणजे, या भेटीत त्यांच्यासोबत ‘परंड्याचे तानाजीराव’ हे सुद्धा हजर होते! या तिन्ही नेत्यांची अत्यंत जवळीक वाढली असून, त्यांच्यात जोरदार ‘हास्यविनोद’ आणि गप्पा रंगल्याचे फोटो समोर आले. ज्या नागपूरकर सरदारांच्या नावाने फेसबुक पिंट्या जिल्ह्यात स्वतःची ‘हवा’ करत होता, तेच सरदार सूर्यराजेंसोबत हसून-खेळून गप्पा मारत आहेत हे पाहून पिंट्या साहेबांच्या पायाखालची वाळूच सरकली!
फेसबुक पिंट्याची ‘कुंडली’ आणि सरदारांचा ‘करेक्ट कार्यक्रम’
मुळात नागपूरकर सरदार फेसबुक पिंट्यावर अचानक नाराज झालेले नाहीत. याची ठिणगी खूप आधीच पडली होती:
-
पत्नीप्रेम विरुद्ध पक्षश्रेष्ठी: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी पक्षश्रेष्ठींनी दिलेला आदेश फेसबुक पिंट्याने धाब्यावर बसवला आणि हुकूमशाही गाजवत स्वतःच्या बायकोलाच झेडपीच्या अध्यक्षपदावर बसवले.
-
‘मी म्हणजे पक्ष’ ही पोपटपंची: एवढंच नाही, तर “धाराशिव जिल्ह्यात केवळ आणि केवळ माझ्यामुळेच पक्ष टिकून आहे,” अशी पोपटपंची फेसबुक पिंट्या वारंवार करत होता.
-
निष्ठावंत संघवाल्यांचा दणका: साहेबांचा हा सगळा उर्मटपणा आणि घराणेशाही पाहून ‘निष्ठावंत संघवाल्यांनी’ फेसबुक पिंट्याची सगळी काळी ‘कुंडली’ नागपूरकर सरदारांच्या दरबारात आधीच मांडून ठेवली होती.
याच कारणास्तव, नागपूरकर सरदारांनी फेसबुक पिंट्याला त्याची जागा दाखवण्यासाठी एक भन्नाट राजकीय खेळी खेळली. त्यांनी आधी एका बाजूने ‘मुरूमकरां’ना ताकद दिली, आणि आता थेट ‘सूर्यराजें’ना पिंट्याच्या बोकांडी नेऊन बसवले आहे!
तात्पर्य:
मल्लू नेरूळकर आणि फेसबुक पिंट्या साहेब, तुम्ही पाकीटमार पत्रकारांना कितीही पाकिटे वाटली आणि सोशल मीडियावर कितीही खोटे ‘ग्राफिक्स’ व्हायरल केले, तरी खरी ताकद कोणाकडे आहे हे नागपूरकर सरदारांनी दाखवून दिलंय. तुम्ही ज्यांच्या जीवावर उड्या मारत होतात, तेच सरदार आता सूर्यराजेंसोबत ‘हास्यविनोद’ करत आहेत!
यामुळे साहेबांच्या प्रतिष्ठेचा आणि खोट्या ‘जवळिकीचा’ फुगा असा काही फुटलाय, की त्याचा आवाज थेट मातोश्रीपासून धाराशिवपर्यंत घुमतोय! आता पुढच्या निवडणुकीत कोण कोणाच्या बोकांडी बसतंय, हे बघणं जास्त मनोरंजक ठरणार आहे.
-बोरूबहाद्दर







