वारीबद्दल खूप काही लिहिले गेले. अनेकांनी वारीचे वर्णन केले. कुणी वारीला भक्तीचा महासागर म्हटले, कुणी चालते-बोलते विद्यापीठ म्हटले, तर कुणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा म्हटले.
पण वारी नेमकी काय आहे, हे शब्दांत सांगणे तसे कठीणच.
कारण…
वारी करायची नसते, अनुभवायची असते!
पंढरीची आषाढी यात्रा २५ जुलै रोजी आहे. पण पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्याची ओढ वारकऱ्याला महिनाभर आधीपासूनच लागलेली असते.
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी…
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी…
संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई, संत गजानन महाराज आणि अशा कितीतरी संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत.
रस्ते भगवेमय झाले आहेत.
टाळांचा नाद आहे. मृदंगाचा ठेका आहे. मुखी हरिनाम आहे आणि प्रत्येकाच्या पावलांना एकच दिशा आहे—
पंढरपूर!
या पालखी सोहळ्यांमध्ये लाखो वारकरी सहभागी झाले आहेत.
कुणाच्या पायात साधी चप्पल आहे. कुणाच्या खांद्यावर छोटीशी पिशवी. कुणाच्या डोक्यावर तुळस आहे, तर कुणाच्या हातात भगवी पताका.
या वारकऱ्याला एक प्रश्न विचारा—
‘कुठे निघालात?’
उत्तर एकच मिळते…
‘आम्ही विठ्ठलाला भेटायला चाललोय!’
किती साधे उत्तर!
पण त्या एका वाक्यात किती मोठी श्रद्धा दडलेली आहे.
आपण देवाकडे जातो तेव्हा मागण्यांची यादी घेऊन जातो. नोकरी मिळू दे, व्यवसाय वाढू दे, पैसा मिळू दे, संकट दूर होऊ दे, मुलांचे चांगले होऊ दे…
माणसाच्या मागण्या कधी संपत नाहीत.
पण या वारकऱ्याला विचारा—
‘पांडुरंगाकडे काय मागणार?’
तो हसतो.
आणि सहज म्हणतो—
‘काही नाही!’
काहीच नाही?
‘आम्ही सुखात आहोत. जे काही आहे, ती त्याचीच कृपा आहे!’
हे उत्तर ऐकल्यानंतर काही क्षण आपणच नि:शब्द होतो.
कारण हा वारकरी एखाद्या आलिशान बंगल्यात राहणारा श्रीमंत माणूस असेलच असे नाही. उलट वारीत सहभागी होणाऱ्यांमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांची संख्या मोठी आहे.
त्याच्या जीवनात अडचणी नाहीत का?
आहेत!
शेतात पाऊस पडेल की नाही, याची चिंता आहे. पेरणीचा खर्च आहे. बियाण्याचे पैसे आहेत. खताचे दर आहेत. कर्जाचा डोंगर आहे. शेतमालाला भाव मिळेल की नाही, याची काळजी आहे.
शेतमजुराच्या हाताला रोज काम मिळेलच याची खात्री नाही.
घरात अडचणी आहेत.
आर्थिक विवंचना आहेत.
दुःख आहे.
वेदना आहेत.
तरीही तो पांडुरंगासमोर आपल्या दुःखाचा पाढा वाचत नाही.
तो म्हणतो—
‘देवा, तू जे दिलंस ते भरपूर आहे!’
ही समाधानाची श्रीमंती कुठून येते?
कदाचित याचे उत्तर वारीत आहे.
वारीसाठी वारकरी अनेक दिवसांपासून आतुरलेला असतो. त्याची तयारी महिनाभर आधी सुरू होते. घरातील कामांचे नियोजन केले जाते. शेतातील कामे मार्गी लावली जातात. पिशवी भरली जाते. टाळ, वीणा, पताका तयार होते.
आणि मग तो दिवस उजाडतो…
वारकरी घराबाहेर पडतो.
पंढरीच्या वाटेला लागतो.
पाय दुखतात.
ऊन तापते.
पाऊस भिजवतो.
कधी चिखलातून चालावे लागते. कधी मुक्कामाच्या ठिकाणी गैरसोय होते. शरीर थकते.
पण मन?
मन मात्र आनंदाने नाचत असते!
कारण प्रत्येक पावलागणिक त्याचा विठ्ठल जवळ येत असतो.
आजच्या जगात सर्व काही असूनही माणूस असमाधानी आहे. मोठे घर आहे, गाडी आहे, हातात महागडा मोबाइल आहे… तरी चेहऱ्यावर चिंता आहे.
आणि दुसरीकडे हा वारकरी आहे.
खांद्यावर छोटीशी पिशवी…
पायात साधी चप्पल…
चेहऱ्यावर ऊन-पावसाचे चटके…
तरी मुखी नाम आणि चेहऱ्यावर समाधान!
कदाचित म्हणूनच वारी समजून घेण्यासाठी तिच्याकडे दुरून पाहून चालत नाही.
काही पावले वारकऱ्यांसोबत चालावे लागते.
टाळांचा नाद ऐकावा लागतो.
‘ज्ञानोबा माऊली… तुकाराम’च्या गजरात स्वतःला हरवून पाहावे लागते.
एखाद्या वारकऱ्याच्या चेहऱ्यावरील समाधान वाचावे लागते.
मग कळते…
वारी करायची नसते, अनुभवायची असते!
लाखो वारकरी पांडुरंगाला भेटायला निघाले आहेत.
त्यांच्या आयुष्यात असंख्य अडचणी आहेत. प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे. प्रत्येकाच्या मनात काही वेदना आहेत.
पण विठ्ठलाकडे त्यांची मागण्यांची मोठी यादी नाही.
त्यांची एकच प्रार्थना आहे…
‘पांडुरंगा, धन नको… दौलत नको… सुखाची हमीही नको…’
‘फक्त एक कर…’
‘माझी वारी कधी चुकू देऊ नको!’
कदाचित यालाच भक्ती म्हणतात.
आणि कदाचित यालाच…
वारी म्हणतात!
— सुनील मधुकर ढेपे







