धाराशिव | राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या पहिल्या यादीवरून शिवसेना (ठाकरे) गटाचे आमदार कैलास पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही,” अशी म्हण वापरत त्यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या धोरणावर हल्लाबोल केला असून, शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवून संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली आहे.
फेसबुक पोस्टद्वारे कैलास पाटील यांनी म्हटले आहे की, सरकारने तब्बल दोन वर्षे अभ्यास केल्याचा गाजावाजा करत कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. मात्र, प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांच्या नावासमोर त्यांनी घेतलेल्या कर्जापेक्षा कमी रक्कम कर्जमाफीसाठी मंजूर झालेली दिसत आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारने कर्जमाफीची घोषणा करताना शेतकऱ्यांना संपूर्ण दिलासा मिळेल, अशी अपेक्षा निर्माण केली होती. मात्र, आता जाहीर झालेल्या याद्यांमध्ये अर्धवट रक्कम दिसत असल्याने कर्जमाफी नेमकी कोणत्या निकषांवर करण्यात आली, कोणती रक्कम माफ झाली आणि उर्वरित रकमेचे काय, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी त्यांनी केली.
नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफीच्या नावाखाली मोठ्या घोषणा आणि जाहिराती करून प्रत्यक्षात अपुरा लाभ देणे म्हणजे शेतकऱ्यांच्या विश्वासाशी केलेला खेळ असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही,” ही म्हण आज सरकारच्या कारभाराला तंतोतंत लागू पडत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे, असे नमूद करत कैलास पाटील यांनी राज्य सरकारने तातडीने अधिकृत खुलासा करावा, कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक करावी आणि पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची संपूर्ण कर्जमाफी देऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.





