धाराशिव भाजपमध्ये जे घडत आहे, ते एका कार्यकर्त्याच्या अपमानापुरते मर्यादित नाही; ते पक्षाच्या संस्कृतीसमोर उभे राहिलेले गंभीर प्रश्नचिन्ह आहे.
35 वर्षे भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरणारा कार्यकर्ता संपर्कमंत्र्यांना भेटण्यासाठी येतो आणि त्याला प्रवेशद्वारावरच रोखले जाते. हा आरोप जर खरा असेल, तर तो केवळ अनिल काळेंचा अपमान नाही; तो भाजपच्या हजारो निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानावर घाव आहे.
2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले राणा जगजितसिंह पाटील आज भाजपचे आमदार आहेत. पक्षाने त्यांना सन्मानाने स्वीकारले, नेतृत्व दिले आणि सत्ता दिली. मात्र, त्यानंतर धाराशिव भाजपमध्ये एक नवी दरी निर्माण झाली—‘नवे भाजप’ आणि ‘जुने भाजप’.
एकेकाळी विरोधी बाकावर बसून भाजप जिवंत ठेवणारे कार्यकर्ते आज स्वतःच्या पक्षातच परके झाल्याची भावना व्यक्त करत आहेत. सत्ता आली, चेहरे बदलले, पण बदलली ती कार्यकर्त्यांशी वागण्याची भाषा. आज अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाटते की, पक्षातील त्यांचे स्थान आता केवळ टाळ्या वाजविण्यापुरतेच उरले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांमध्येही याच नाराजीची कुजबुज होती. उमेदवारीपासून पदांपर्यंत अनेक निर्णयांमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची भावना निर्माण झाली. त्या वेळी अनेकांनी पक्षशिस्त म्हणून मौन बाळगले. पण प्रत्येक मौनाला एक मर्यादा असते. अनिल काळे यांच्या आरोपांमुळे ती खदखद आता जाहीरपणे बाहेर पडू लागली आहे.
विशेष म्हणजे, अनिल काळे हे तुळजापूर मतदारसंघातील जुने भाजप कार्यकर्ते असून विधानसभा निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छाही होती. त्यामुळे राजकीय मतभेद अधिक तीव्र झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. या चर्चेवर संबंधित नेत्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
आज प्रश्न एका व्यक्तीचा नाही. प्रश्न असा आहे की, भाजपमध्ये निष्ठेला किंमत आहे की केवळ सत्तेला? पक्ष अडचणीत असताना रात्रंदिवस राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान राहणार की सत्ता मिळाल्यानंतर त्यांनाच दाराबाहेर उभे केले जाणार?
अनिल काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे लिखित तक्रार करण्याची घोषणा केली आहे. आता राज्य नेतृत्व या प्रकरणाकडे केवळ स्थानिक वाद म्हणून पाहते की संघटनात्मक इशारा म्हणून, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राजकारणात नेते येतात आणि जातात. सत्ता येते आणि जाते. पण पक्ष जिवंत ठेवतो तो कार्यकर्ता. जर त्याच कार्यकर्त्याला अपमान, उपेक्षा आणि बंद दारे मिळत असतील, तर तो इशारा केवळ धाराशिव भाजपसाठी नाही, तर संपूर्ण संघटनेसाठी धोक्याची घंटा आहे.
कारण कार्यकर्ता दुखावला, तर पक्ष हरतो; आणि कार्यकर्ता दुरावला, तर सत्ता टिकत नाही.





