धाराशिव: केंद्रात सलग तिसऱ्यांदा बहुमताची सत्ता, राज्यातही गेल्या १० वर्षांत बहुतांश काळ सत्तेची चाके हातात… तरीही धाराशिवमध्ये ‘जगात भारी’ असणाऱ्या भाजपला स्वतःच्या हक्काच्या भवनासाठी परक्याच्या तालावर नाचावं लागतंय, हीच खरी शोकांतिका आहे. काँग्रेसचे स्वतःचे आलिशान भवन शहरात दिमाखात उभे असताना, सत्ताधाऱ्यांच्या नशिबी मात्र ‘भाड्याचा थाट’ आणि परक्याच्या वास्तूचा आसरा आला आहे.
जागा स्वतःची, मग टाळा कोणाचा?
सांजा चौकात भाजपच्या स्वतःच्या नावे हक्काची जागा उपलब्ध आहे. तरीही “तिथे भवन उभारणीला नेमका कोणाचा खोडा आहे?” असा सवाल आता दबक्या आवाजात विचारला जात आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले नेते राणा जगजितसिंह पाटील यांच्या खाजगी इमारतीमधूनच सध्या भाजपचा कारभार हाकला जात आहे. त्यामुळे पक्षाचा कारभार चालतोय की नेत्याची खाजगी दुकानदारी? असा संतप्त सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.
निष्ठावंतांची उघड-उघड मुस्कटदाबी!
वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन उन्हा-तान्हात राबणाऱ्या जुन्या आणि निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची या प्रकारामुळे मोठी घुसमट होत आहे. आयारामांच्या वळचणीला जाऊन बसलेल्या पक्ष कार्यालयामुळे निष्ठावंतांचा स्वाभिमान दुखावला गेला असून, त्यांची पद्धतशीरपणे मुस्कटदाबी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
“देशात सत्ता, राज्यात सत्ता… मग धाराशिवच्या भाजप भवनाला कोणाचं ग्रहण?” असा टोला आता सामान्य नागरिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते मारत आहेत. आता तरी पक्षाचे वरिष्ठ नेते यावर लक्ष देऊन स्वमालकीचे ‘भाजप भवन’ उभे करणार, की आयात केलेल्या नेत्यांच्या इमारतीतच पक्षाचा संसार थाटून राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





