तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, या गोंडस नावाखाली तब्बल आठ कोटी रुपये खर्चून उभारलेले अद्ययावत तुळजापूर बसस्थानक पहिल्याच पावसात साफ कोलमडले आहे. ८ कोटींचा निधी पाण्यात गेला असून, हे बसस्थानक म्हणजे केवळ भ्रष्टाचाराचे मॉडेल ठरल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
काही महिन्यांपूर्वीच राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात, कोट्यवधींच्या जाहिरातबाजीसह या बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसाने या भव्यतेचा फुगा फोडून एसटी महामंडळ आणि संबंधित कंत्राटदाराचा निकृष्ट कारभार चव्हाट्यावर आणला आहे.
कंट्रोलरच्या हातात छत्री; कारभाराचे हसे!
बसस्थानकातील सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या ‘कंट्रोल रूम’च्या छतातून पावसाच्या धारा लागल्याने, तेथील कर्मचाऱ्याला एका हातात छत्री धरून तर दुसऱ्या हातातून वाहतूक नियंत्रणाचे काम करावे लागत आहे. एसटी प्रशासनाच्या या लाजीरवाण्या आणि अक्षम्य भोंगळ कारभाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, संपूर्ण राज्यभरातून यावर तीव्र संताप आणि धिक्कार व्यक्त होत आहे.
भाविकांची ससेहोलपट; ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?
लाखो भाविकांच्या आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी उभारलेल्या या इमारतीत ठिकठिकाणी पाणी साचले असून प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून केवळ उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार चालू देणाऱ्या संबंधित कंत्राटदाराची आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार की नेहमीप्रमाणे पांघरूण घालणार? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
राजकीय टोलेबाजीने वातावरण तापले

या गंभीर प्रकारानंतर राजकीय वर्तुळातूनही कडक शब्दांत टीका होत आहे. “तुळजापूरच्या आमदाराचे विकासाचे मॉडेल म्हणजे तुळजापूर बस स्टॅन्ड,” अशी जळजळीत आणि खरमरीत टिप्पणी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे पदाधिकारी सोमनाथ गुरव यांनी केली आहे.
जनतेच्या करातून गोळा झालेल्या ८ कोटी रुपयांची थेट धुळधाण करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करून बसस्थानकाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.





