भूम – भूम नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांच्या जीविताला काही नगरसेवकांपासून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष धोका निर्माण झाला असून, त्यांना शासकीय कामकाज करण्यासाठी तातडीने पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे, असे खळबळजनक पत्र धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांनी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या पत्रामुळे धाराशिव जिल्ह्यातील महसूल, पोलीस आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
मुख्याधिकारी शैला डाके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे २७ जुलै २०२६ रोजी पत्र देऊन तक्रार नोंदवली होती. त्यानुसार जनशक्ती भूम शहर विकास आघाडीतील नगरसेवक रुपेश शेंडगे, अनिल शेंडगे, चंद्रमणी गायकवाड, आबासाहेब मस्कर, रामराजे कुंभार, नवनाथ रोकडे, विठ्ठल बागडे आणि श्री. पवार हे आठ नगरसेवक भूम नगरपरिषद कार्यालयात पूर्वग्रहदूषित मानसिकतेने हजर राहून पालिका कर्मचाऱ्यांना नियमबाह्य कामे करण्यासाठी सतत धमकी देतात व दबाव आणतात.
तसेच, कार्यालयात अर्वाच्य शिवीगाळ करणे, आरडाओरडा करणे आणि “कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना कसे काय कामकाज करतात ते बघून घेऊ” अशा शब्दांत धमकावून शासकीय कामात अडथळा निर्माण करत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
जीविताला धोका व भीतीदायक वातावरण
नगरसेवकांच्या या त्रासामुळे कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करणे अत्यंत अवघड आणि भीतीदायक झाले असून, मुख्याधिकारी यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत कामकाज करणे कठीण झाल्याने कार्यालयीन वेळेत नगरपरिषद परिसरात पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी मुख्याधिकारी यांनी केली होती.
या अर्जाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांनी २७ जुलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक, धाराशिव यांना पत्र लिहून संबंधितास पोलीस संरक्षण देण्यासंदर्भात योग्य ते आदेश तातडीने निर्गमित करावेत, असे निर्देश दिले आहेत.
नगरसेवकांचे प्रत्युत्तर: “भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्यामुळेच कट”
दरम्यान, या संपूर्ण घडामोडींवर मुख्याधिकारी शैला डाके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला.
दुसरीकडे, आरोप झालेल्या नगरसेवकांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही मुख्याधिकारी शैला डाके यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याच तक्रारींचा राग मनात धरून आणि सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या प्रशासनाने आमच्यावर दबाव आणण्यासाठी हा बनाव व कट रचला आहे,” असे प्रत्युत्तर संबंधित नगरसेवकांनी दिले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या थेट पत्रव्यवहारामुळे भूम नगरपरिषदेतील सत्ताधारी व विरोधमांमधील वाद अधिक चिघळला असून, आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






