उमरगा: उमरगा तालुक्यातील औराद (गु.) येथे विजेची वायर लांबवणाऱ्या भामट्यांना ग्रामस्थांनी पकडल्यानंतर, या चोरीच्या प्रक्रियेत उमरगा नगर परिषदेच्या घंटागाडीचा (कचरा गाडी) संशयास्पद वापर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या गंभीर प्रकरणाची दखल घेत उमरगा नगर परिषदेचे नगराध्यक्ष किरण रविंद्र गायकवाड यांनी कडक पावले उचलली आहेत. त्यांनी आज नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन या संपूर्ण प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.
कंत्राटदाराच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह; तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश
नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी स्पष्ट केले की, नगर परिषद उमरगाने शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम सोलापूर येथील ‘यशश्री एंटरप्राइजेस’ या संस्थेकडे करारानुसार एक वर्षांपूर्वी दिले आहे. करारातील अटी व शर्तींनुसार, संबंधित घंटागाडीचा वापर, देखभाल, सुरक्षितता आणि संपूर्ण जबाबदारी ही संबंधित कंत्राटदाराची (ठेकेदाराची) आहे.
शासकीय मालमत्तेचा चोरीसारख्या संशयास्पद कामासाठी वापर झाल्याने नगराध्यक्षांनी यावर गंभीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना खालील मुद्द्यांवर तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत:
१) या प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे?
२) चोरीची घटना कोणत्या परिस्थितीत घडली?
३) शासकीय वाहन शहराबाहेर औरादला नेमके कोणाच्या आदेशाने गेले?
४) संबंधित कंत्राटदाराने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे किंवा नाही?
५) करारातील अटी व शर्तींचे पालन झाले आहे किंवा नाही?
करारभंग किंवा निष्काळजीपणा आढळल्यास कठोर कारवाई
“या चौकशीत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, करारभंग किंवा हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी,” असे स्पष्ट निर्देश नगराध्यक्ष गायकवाड यांनी दिले आहेत.
नगरपरिषदेच्या मालमत्तेच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची सकल चौकशी करून सत्य नागरिकांसमोर आणले जाईल. पारदर्शकता, जबाबदारी आणि जनहित हीच आमची भूमिका असल्याचे नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी नमूद केले आहे. नगराध्यक्षांच्या या भूमिकेमुळे या घोटाळ्यातील दोषींवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात असून, कंत्राटदाराचे धाबे दणाणले आहेत.





