धाराशिव : आळणी गावातील घटनांवरून सुरू झालेल्या वादाला शनिवारी नवे वळण मिळाले. लहुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी धाराशिव येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आळणीचे माजी सरपंच प्रमोद नेताजी वीर यांच्याविरोधात विविध गंभीर आरोप केले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात आरोप करण्यात आला की, आळणी ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीत अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी सरपंचपद आरक्षित झाल्यानंतर मातंग समाजाला राजकीयदृष्ट्या मागे टाकण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले. समाजात जातीय तेढ निर्माण करून मातंग समाजाची बदनामी करण्यात येत असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला.
तसेच, संबंधित माजी सरपंच कथित अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत असून, “पिंजरा कला केंद्र” नावाने सुरू असलेल्या कथित व्यवसायामुळे अनेक युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, अनेक कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाले, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी आणखी आरोप केला की, पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी शाळेतील विद्यार्थिनींचा वापर करण्यात आला. संबंधित विद्यार्थिनींना घटनेची माहिती नसतानाही त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला, तसेच शाळा प्रशासनाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय, मातंग समाजातील तरुणांना गुन्हेगार म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न होत असून, सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. काही समाजनेत्यांवर कारवाई करण्यासाठी एका प्रमुख लोकप्रतिनिधीकडून पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्यात आल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला.
लहुजी शक्ती सेनेच्या शिष्टमंडळाने इशारा दिला की, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. अन्यथा मातंग समाजाच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल.





