धाराशिव: एरवी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बांधावर चुकून जरी गांजाचं एखादं रोपटं सापडलं, तर पोलीस थेट सिंघमच्या स्टाईलमध्ये एन्ट्री घेतात आणि त्याला थेट बेड्याच ठोकतात. पण, धाराशिवमध्ये सध्या कायद्याच्या रक्षकांनीच शेतीत एक वेगळाच ‘प्रयोग’ केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रयोगाची सध्या संपूर्ण जिल्ह्यात ‘झिंग झिंग झिंगाट’ चर्चा रंगली आहे.
नेमकं काय घडलंय?
धाराशिव शहरालगत असलेल्या जहागीरदार वाडी म्हणजे गड पाटीजवळ चार पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये अचानक ‘कृषीक्रांती’ करण्याची इच्छा जागृत झाली. त्यांनी मिळून एक शेत घेतलं. शेतात ज्वारी, बाजरी किंवा सोयाबीन येईल अशी सगळ्यांची अपेक्षा होती, पण तिथे चक्क एक भलं मोठं गांजाचं झाड डोलताना आढळून आलं! आता पोलिसांची शेती म्हटल्यावर पीक पण जरा ‘हाय लेव्हल’चं असणारच ना!
पण या ‘हाय’ झालेल्या वातावरणात भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कांबळे यांनी एंट्री घेतली आणि सगळा खेळच बिघडवला. त्यांनी थेट ग्रामीण पोलिसांना या ‘औषधी’ वनस्पतीची माहिती दिली.
आरोपी ‘अज्ञात’ इसम (म्हणजे भूत असावं!)
कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, हे शेत ग्रामीण पोलीस स्टेशनचेच कर्मचारी सुधाकर भांगे यांच्या नावावर आहे. आता मालक पोलीस, शेत पोलिसांचं, पण पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा कोणावर दाखल केला? तर म्हणे ‘अज्ञात इसमाविरुद्ध’! म्हणजे रात्रीतून एखादा अदृश्य माणूस आला, त्याने पोलिसांच्या शेतात खड्डा खणला, गांजाचं बी पेरलं, त्याला पाणी घातलं आणि तो झाड मोठं होईपर्यंत तिथेच वाढवून गायब झाला, असा पोलिसांचा दावा असावा.
तक्रारदारालाच धमक्यांचा ‘प्रसाद’
‘आमच्या शेतातलं झाड जगाला का दाखवलंस?’ या रागातून शेतमालक (म्हणजेच पोलीस कर्मचारी) भांगे हे आपल्याला धमक्या देत असल्याचा दावा विश्वनाथ कांबळे यांनी केला आहे. तशी तक्रार त्यांनी थेट जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. थोडक्यात सांगायचं तर, “चोरी तो चोरी, वरून सीनाजोरी!”
पीआय साहेबांचं ‘अचाट’ लॉजिक!
या संपूर्ण प्रकरणात सर्वात भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे ती ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी. ते म्हणतात, “पोलिसाला जर गांजाच लावायचा होता, तर एक झाड कशाला लावलं असतं? भरपूर झाडं लावली असती ना! आमचा तपास सुरू आहे…”
वा रे वा! म्हणजे पोलिसांना जर एखादा ‘धंदा’ करायचाच असेल तर तो रिटेलमध्ये नाही, थेट होलसेलमध्येच करतील, असा पीआय साहेबांचा ठाम विश्वास दिसतोय! साहेबांच्या या लॉजिकला तोड नाही.
तात्पर्य:
कायदा सर्वांसाठी समान असतो, पण काही लोकांसाठी तो जरा जास्तच ‘समान’ असतो. सामान्य शेतकरी असता तर आतापर्यंत आतमध्ये सडत असता, पण इथे खाकी वर्दीतले शेतकरी असल्यामुळे सध्या फक्त ‘तपास’ (आणि गांजाचं झाड) जोमात सुरू आहे!
ताजा कलम: आता या अज्ञात इसमाला शोधण्यासाठी पोलीस कोणत्या ‘बाबाची’ मदत घेतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे!





