धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांच्या कृषी निविष्ठा (Agriculture Inputs) घोटाळ्याप्रकरणी कृषी विभागातील १४ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर शिस्तभंग आणि सामूहिक विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असली तरी, या घोटाळ्यात अधिकाऱ्यांशी संगनमत असलेल्या २९ शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) आणि २ निर्मिती कंपन्यांना मात्र ‘राजाश्रय’ मिळत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
काय आहे नेमका घोटाळा?
एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (INM) कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना निविष्ठा वाटप करताना मोठा भ्रष्टाचार झाला आहे. वैयक्तिक शेतकरी किंवा शेतकरी गटांना प्राधान्य देण्याऐवजी शेतकरी कंपन्यांना झुकते माप दिले गेले.
चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत:
-
बोगस नोंदी: मृत शेतकऱ्यांच्या नावे निविष्ठा वाटप दाखवण्यात आले आहे.
-
खोटी कागदपत्रे: अनेक ठिकाणी एकच आधार क्रमांक वापरला गेला असून, एकाच हस्ताक्षरात खोट्या सह्या करून कागदपत्रे रंगवण्यात आली आहेत.
-
वाटपाचा पत्ताच नाही: प्रत्यक्षात शेतकऱ्यांना निविष्ठा मिळाल्याच नाहीत. काही कंपन्यांनी तर निविष्ठा वाटपाच्या फोटोऐवजी चक्क प्रशिक्षण कार्यक्रमांचे फोटो जोडून बोगस बिले काढली.
-
गुणवत्ता चाचणीकडे पाठ: शासकीय प्रयोगशाळेतून निविष्ठांचे नमुने तपासून घेणे बंधनकारक असतानाही अहवाल प्राप्त न करताच कंपन्यांना अनुदान अदा करण्यात आले.
कारवाईचा बडगा फक्त अधिकाऱ्यांवरच का?
लातूर विभागाचे कृषी सहसंचालक महेशकुमार तीर्थकर यांनी संबंधित १४ अधिकाऱ्यांचे निलंबन करून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या अधिकाऱ्यांचे मुख्यालय लातूर येथे हलवण्यात आले असून त्यांना १० दिवसांच्या आत म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवून, खोटे रेकॉर्ड तयार करणाऱ्या आणि शासनाला चुना लावणाऱ्या शेतकरी कंपन्यांना अभय का दिले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. या सर्व प्रकारात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.
या कंपन्यांवर विशेष मेहेरबानी:
सोलपूर जिल्ह्यातील मोहोळ येथील ‘स्टार फर्टिलायझर अँड पेस्टीसाईड’ आणि धाराशिवमधील मंगरूळ येथील ‘कृषी जगत फार्मर प्रोड्युसर कंपनी’ या दोन निर्मिती कंपन्यांकडून सर्व तालुक्यांत निविष्ठा खरेदी केल्या गेल्या. कृषी जगत कंपनीला तर लाखो रुपयांची रक्कम रोखीने आगाऊ (Advance) देण्यात आली, ज्याची नियमात कोणतीही तरतूद नाही. तसेच, धाराशिव, लोहारा, कळंब, परंडा, तुळजापूर आणि उमरगा तालुक्यातील जवळपास २९ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या बोगस वाटपात सहभाग घेतल्याचे उघड झाले आहे.





