धाराशिव: ‘आपला जीव धाराशिव’च्या नादात प्रशासन सध्या भलत्याच ‘व्हिजन’मध्ये मग्न आहे. पण, या ‘व्हिजन’च्या पडद्यामागे काय भयंकर खेळ सुरू आहेत, हे पाहिल्यावर कोणाचेही डोके चक्रावून जाईल. एकीकडे कोरोना काळात शिक्षकांनी दिलेल्या निधीचा गेल्या सहा वर्षांपासून पत्ता नाही, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या जागेवर थेट ‘बीओटी’च्या (BOT) माध्यमातून डल्ला मारण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी सुरू केली आहे!
१.१५ कोटींचा कोरोना निधी: ११ बैठका, शून्य निर्णय आणि गुरुजींचा संताप!
२०२०-२१ च्या कोरोनाच्या भीषण काळात प्रशासनाच्या तिजोरीत खडखडाट असताना, जिल्ह्यातील ४,२५४ जिल्हा परिषद शिक्षकांनी ‘देवदूत’ बनून मदतीचा हात दिला. प्रत्येकाने आपल्या घामाचा दोन दिवसांचा पगार दिला. यातून तब्बल ८७ लाख रुपये जमा झाले. आज सहा वर्षांनंतर या निधीवर व्याज पडून हा आकडा १ कोटी १५ लाख रुपयांवर पोहोचला आहे.
पण प्रशासनाचा नाकर्तेपणा बघा! हा सव्वा कोटींचा निधी कसा खर्च करायचा, यावर शिक्षक संघटनांसोबत आतापर्यंत तब्बल ११ बैठका झाल्या, पण यातून शून्य निष्पन्न झाले!
-
सुरुवातीला तुळजापुरात शिक्षक भवन उभारण्याच्या गप्पा मारल्या, त्या हवेत विरल्या.
-
शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा झाली, तीही बारगळली.
आता गुरुजींची साधी आणि रास्त मागणी आहे की, जिल्ह्यातील २१३ शाळांमधील तब्बल ६३८ वर्गखोल्या जीर्ण झाल्या आहेत, तिथे हा निधी वापरून पोरांसाठी शाळा दुरुस्त करा. पण प्रशासनाला शाळा दुरुस्तीत काही ‘रस’ (की कमिशन?) नसल्याने हा विषय जाणीवपूर्वक भिजत ठेवला जात आहे.
“आम्हाला खायला भरपूर जागा आहेत…” – माऊलींच्या विधानाने गुरुजींची उडाली झोप!
या सव्वा कोटींच्या निधीचे पुढे काय होणार, या चिंतेने शिक्षकांना आधीच ग्रासले आहे. कारण, यापूर्वी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी जमा केलेले ४० लाख रुपये एका अधिकाऱ्याने चक्क स्वतःच्या खात्यावर वळते करून ‘डल्ला’ मारण्याचा प्रयत्न केला होता. कारवाईच्या इशाऱ्यानंतर तो पैसा परत आला.
पण आता गुरुजींच्या भीतीत भर घातली आहे ती थेट जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील (माऊली) यांच्या एका अजब विधानाने! काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत माऊली अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाल्या होत्या, “आम्ही कुठेही खात नाही, आम्हाला खायला भरपूर जागा आहेत!”
हे विधान ऐकल्यापासून शिक्षकांच्या पोटात गोळा आला आहे. आपला १.१५ कोटींचा कोरोना निधी माऊलींच्या ‘त्या’ खायला भरपूर असलेल्या जागांपैकीच एका जागेत ‘हडप’ तर होणार नाही ना, या भीतीने गुरुजींना घाम फोडला आहे!





