धाराशिव : वर्गणीच्या १ हजार ५०० रुपयांच्या हिशोबावरून झालेल्या वादातून पाच जणांनी दोन भावांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण केल्याची घटना चिखली येथे १० ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी गॅरेजची तोडफोड करून नुकसान केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नेताजी दाणे (वय ३२, रा. चिखली, ता. जि. धाराशिव) आणि त्यांचा चुलत भाऊ महादेव तानाजी दाणे यांच्यासोबत हा प्रकार घडला.
आकाश महादेव पोंदे, समाधान तानाजी दाणे, गणेश महादेव लोकरे, सचिन महादेव पोंदे आणि महादेव एकनाथ पोंदे, सर्व रा. चिखली, हे १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन आले. बाळू मामाच्या वर्गणीतील १ हजार ५०० रुपयांचा हिशोब मागण्याच्या कारणावरून त्यांनी महादेव दाणे यांच्याशी वाद घातला.
यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड आणि काठीने संदीप दाणे व महादेव दाणे यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच गॅरेजची तोडफोड करून नुकसान केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी संदीप दाणे यांनी १३ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३(५), ३२४(४) व १२६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बेंबळी पोलीस करीत आहेत.






