धाराशिव – शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. याकडे खासदार, आमदार असो की माजी नगराध्यक्ष, कोणीही लक्ष देत नाही. यामुळे शहरातील तरुणांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे रस्त्यांच्या दुरुस्तीची विनंती केली होती. याला प्रतिसाद देत आ. पाटील यांनी दिनांक १७ जुलै रोजी प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी करून नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यांनी तातडीने कालबद्ध कार्यक्रम आखून रस्ते दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याबाबत आदेश दिले होते.
पाहणी करताना आ. पाटील यांच्यासमोर महिला व युवकांनी खराब रस्त्यांमुळे त्यांना होणाऱ्या अडचणी मांडल्या. भुयारी गटार योजनेच्या कामासाठी शहरातील जवळपास सर्वच भागातील रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. यामुळे थोडासा पाऊस झाला तरी सर्व रस्ते चिखलाने माखले जातात. वाहने तर दूरच, पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालणे अवघड होते. अशा परिस्थितीत पालिकेने योग्य पद्धतीने रस्त्यांची देखभाल केली नाही. मुरूमाऐवजी मोठे दगड रस्त्यावर टाकण्यात आले. यामुळे अनेकजण रस्त्यावरून घसरून पडून जखमी झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले.
नागरिकांच्या व्यथा ऐकून आ. पाटील यांनी मुख्याधिकारी फड यांना धारेवर धरले व यासाठी जबाबदार अभियंत्याला नोटीस देण्याचे आदेश दिले. भुयारी गटार योजनेचे काम झाले त्या ठिकाणी तातडीने ट्रेंचवर्क करण्याचे, मुरूम टाकण्यासाठी टेंडर एकाऐवजी ६ जणांना देण्याचे व तातडीने रस्ते दुरुस्ती चालू करण्याचे आदेश दिले. यानुसार, पालिकेने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे.
आ. पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे नगरपालिका प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्ती केली आहे तसेच यासाठी जबाबदार अभियंता श्री. दुकर वैजीनाथ यांना नोटीस दिली आहे. तसेच, भुयारी गटार योजनेच्या कंत्रादारांना नगर परिषद गेट ते महात्मा फुले चौक, महात्मा फुले चौक ते टीव्ही सेंटर, एसपी ऑफिस ते माणिक चौक, पुष्पक मंगल कार्यालयासमोरील रस्ता, विसर्जन विहीर ते सुधीर पाटील यांचे घर, आणि रामकृष्ण पेट्रोलपंप स्वामी समर्थ मंदिर रस्ता या ठिकाणचे ट्रेंच काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. रस्ते दुरुस्तीला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
उबाठा गटाचे वरातीमागून घोडे – नितीन काळे
धाराशिव शहराचे खासदार, आमदार व नगराध्यक्ष पद गेली ५ वर्षांपासून उबाठा गटाकडे आहे. त्यांच्या भ्रष्ट व अकार्यक्षम कारभारामुळे शहरातील नागरिकांना आज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आज शहरातील रस्ते व नाल्यांची जी दुर्दशा झाली आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार हेच लोक आहेत. काल आमदार राणा पाटील यांनी पाहणी केली व काम सुरू झाले की लगेच यांनी आंदोलनाचे नाटक सुरू केले आहे. यापूर्वी देखील त्यांनी उजनी योजनेचे पाणी शहराच्या जवळ आले की आंदोलन केले होते, पिकविम्याचे पैसे जमा व्हायला सुरू झाले की उपोषण केले होते. आता देखील त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे, तो देखील त्याच धर्तीवर केवळ स्टंटबाजी आहे.